ठाकरे बंधू एकत्र आले तर ... ; खा. संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) - गेल्या काही आठवड्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय जवळिकीबाबत चर्चांना उधाण आलं आहे. एप्रिलच्या अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत यावर भाष्य करताना, "आमच्यातील मतभेद महाराष्ट्रापेक्षा मोठे नाहीत," असं विधान केलं. त्यांच्या या विधानाला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता गडद झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. "उद्धव ठाकरे काय म्हणाले ते लक्षात घ्या – ते महाराष्ट्राच्या मनातलं बोलतात. दोन्ही बंधू एकत्र येणार, यावर माझा ठाम विश्वास आहे. दोघं एकत्र आले, तर अनेकांची चिंता वाढेल. आमच्याकडून गेलेले काही लोकही हादरले आहेत," असं राऊत म्हणाले.
राऊत यांनी सूचित केलं की, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. त्यांचा अप्रत्यक्ष रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होता. "ठाकरे एकत्र आले, तर नव्या ऊर्जेचा उदय होईल. फुटीर गट अस्तित्वात राहणार नाहीत. त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल असंही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे दोघंही राजकीय अस्तित्वासाठी झगडत आहेत. राज ठाकरे यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही, तर उद्धव ठाकरे गटाचे केवळ २० उमेदवार विजयी झाले. त्यामुळे "ठाकरे" ब्रँडवर आलेलं संकट दूर करण्यासाठी आता दोघांनाही एकमेकांची गरज भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी युतीबद्दल सकारात्मक संकेत देण्यात येत आहेत.