Punjab News : मैत्रीला काळीमा फासणारी घटना , नेमकं काय घडलं ?

Punjab News : मैत्रीला काळीमा फासणारी घटना , नेमकं काय घडलं ?

फरिदाबाद: एका अत्यंत क्रूर आणि अमानुष "गमती"चा शेवट एका तरुणाच्या मृत्यूमध्ये झाला आहे. १६ मे रोजी, लग्न समारंभानंतर मित्रांसोबत गेलेल्या मनोज चौहान या ३० वर्षीय तरुणाच्या गुप्तांगात पाण्याचा पाईप घालून सबमर्सिबल सुरु करण्यात आला, ज्यामुळे त्याचे आतडे फाटले आणि १७ मे रोजी त्याचा मृत्यू झाला.

मृताचा भाऊ आनंद चौहान याच्या तक्रारीवरून, संदीप आणि राहुल उर्फ कबुतर या दोन आरोपींना अटक झाली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतर जबाबदारी झटकण्यासाठी मनोजला बेशुद्ध अवस्थेत घरी सोडले गेले व दारू जास्त झाल्याचा बनाव करण्यात आला.

परंतु जेव्हा कुटुंबीयांनी त्याच्यावर पाणी ओतले, तेव्हा तो वेदनांनी विव्हळू लागला. त्याच्या तब्येतीच्या घातक स्थितीतून ही विकृती उघडकीस आली. रुग्णालयीन तपासणीत त्याचे आतडे फाटले असल्याचे स्पष्ट झाले. पुढे एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मनोजच्या पश्चात त्याची पत्नी, पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने काम सुरु केलं होतं. मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.