अमल महाडिक यांचे व्हिजन सर्वव्यापी- राजू दिंडोर्ले

अमल महाडिक यांचे व्हिजन सर्वव्यापी- राजू दिंडोर्ले

कोल्हापूर प्रतिनिधी - जसजशी विधानसभा निवडणूक जवळ आली, तसतसा दक्षिणचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा लोकांना फसवण्याचा डाव सुरु झाला आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी काहीच कामे केली नाहीत. मात्र लोकांसमोर जाताना काहीतरी दाखवले पाहिजे, म्हणून ते आता केंद्र शासनाचा निधी सुद्धा आमदार फंड म्हणून सांगत आहेत. पण लोकांना हे कळून चुकले आहे. असा आरोप राजू दिंडोर्ले यांनी केला.

साने गुरुजी वसाहत येथे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. "विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघातील प्रत्येक भागात स्कॅन कोड लावले आहेत. बॅनरवर कोटींचे आकडे टाकून विकासात्मक कामे केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष या कोडवर गेल्यावर केंद्र शासनाच्या कामांचे फोटो यावर दिसून येत आहेत. राज्य महामार्ग, इतर मतदारसंघातील रस्ते, जल जीवन मिशन व इतर अशी बरीच कामे यात दिसतात. जी केंद्र शासनाच्या निधीतून झाली आहेत. त्यांच्या या खोट्या प्रचाराला काय म्हणायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

यावेळी बोलताना शौमिका महाडिक म्हणाल्या मतदारांनी सुज्ञ पणे मतदान करावे. "मतदान करत असताना तुमच्यासमोर असणाऱ्या पर्यायांचा योग्यरीत्या विचार करा. २०१४ ते २०१९ या कार्यकाळात झालेला विकास विरुद्ध २०१९ ते २०२४ या काळात झालेला विकास याची तुलना करा. याशिवाय दोन्ही उमेदवारांमध्ये काय फरक आहे हे बघा. केवळ मोठमोठ्या रकमा बॅनरवर लावून खोटी बॅनरबाजी करणारा नेता हवा आहे की तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष विकासात्मक कामे करणारा नेता हवा आहे हे ठरवा." असे त्या यावेळी म्हणाल्या. 

दरम्यान महायुती सरकारच्या विकासात्मक धोरणांची माहिती त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, "महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देत त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकार तत्पर आहे. आजही पैशाअभावी कित्येक हुशार, होतकरू मुलींची शिक्षणे अर्धवट राहिली आहेत. त्यांना उच्च शिक्षणाचा लाभ घेता आलेला नाही. पण महायुतीने उच्च शिक्षण मोफत करून मुलींसाठी उच्च शिक्षणाची कवाडे खुली केली आहेत. याउलट ऋतुराज पाटील यांनी मात्र केवळ आपल्या शिक्षणसंस्था मोठ्या करून गरीब लोकांकडून पैसे उकळले आहेत." 

१८ वर्षे महापालिकेची सत्ता असूनही कोल्हापूरची अवस्था २० वर्षांपूर्वी होती तशीच आहे. इथले तरुण शिक्षणासाठी बाहेर जातात ते परतून येतच नाहीत. त्यांना या शहरात होणाऱ्या असुविधेमुळे परत यावेसे वाटत नाही. ही सद्यस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांना इकडे वळविण्यासाठी जिल्ह्यात चांगल्या कंपन्यांनी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ऋतुराजनपाटलांकडून ते होणार नाही कारण ते जाणीवपूर्वक तसे करणार नाहीत. तसे केले तर त्यांचा व्यवसाय ठप्प होईल याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, असा खोचक टोमणा त्यांनी यावेळी मारला. 

सभेला माजी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, विशाल दिंडोर्ले, सतीश हराळे, अरुण हराळे, राजू भोसले, सागर साळोखे, शिवाजी देसाई, गणेश शिंदे, किरण कोळेकर, स्वप्नील साठे, आनंद पाटील, आकाश हतकर, पांडुरंग सपाटे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील तमाम बंधू -भगिनी आयोजित होते.