उत्तम औद्योगिक पर्यावरणासाठी शिक्षण, उद्योग, शासन यांचा समन्वय आवश्यकच: डॉ. संजय धांडे

कोल्हापूर : देशात उत्तम औद्योगिक पर्यावरण निर्माण होण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि शासन या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय झालाच पाहिजे, असे प्रतिपादन आयआयटी, कानपूरचे माजी संचालक तथा उज्जैनच्या अवंतिका विद्यापीठाचे कुलपती ‘पद्मश्री’ डॉ. संजय धांडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आजपासून ‘विकसित भारत-२०४७ साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप्स’ या विषयावर आयोजित ‘शिक्षण, उद्योग आणि शासन परिषद १.०’ या परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. तर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्र आणि एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या परिषदेला पीएम-उषा अर्थसहाय्य लाभले आहे.
डॉ. संजय धांडे म्हणाले, आजवर शिक्षण आणि उद्योग यांच्याविषयीच्या परिषदा पाहिल्या आहेत. मात्र, शिवाजी विद्यापीठात प्रथमच शासन हा घटक त्यात समाविष्ट झाला आहे. शासन म्हणजे व्यापक अर्थाने समाज ही बाब लक्षात घेऊन समाजाच्या अपेक्षांची आणि गरजांची पूर्ती करणारे स्टार्टअप निर्माण व्हावेत, अशी भूमिका त्यामागे दिसून येते. आपल्या समस्यांवर आपणच उपाय शोधले पाहिजेत, या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः अभियंत्यांनी स्टार्टअपकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. त्याही पुढे जाऊन शिक्षकांकडून स्टार्टअपविषयी केवळ मार्गदर्शन नव्हे, तर कृतीशील उदाहरणे निर्माण व्हावीत आणि अशा सर्वांना बँकांनी आवश्यक ते पाठबळ पुरवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अणुऊर्जा, संरक्षण या क्षेत्रांमध्ये स्टार्टअप विकासाच्या, संशोधनाच्या अनेक संधी असून त्या दृष्टीने अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांसह उपयोजनातही मोठे बदल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कोल्हापूरला उद्योजकतेचा मोठा वारसा’
कोल्हापूरला उद्योजकता संस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे. फिरता रंगमंच निर्माण करणाऱ्या बाबूभाई मिस्त्रींपासून ते पिस्टन्ससाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या मेनन यांच्यापर्यंत अनेक उदाहरणे सांगता येतील. फौंड्रीपासून ते वाद्यनिर्मितीपर्यंतचे अनेक उद्योग व्यवसाय येथे बहरले आहेत. हा वारसा सांभाळत असताना आता आपल्याला या उद्योगांची वेगळ्या प्रकारे बांधणी करावी लागणार आहे. त्यासाठी वेगळे स्वरुप देऊन कालसुसंगत राहण्याच्या दृष्टीनेही कोल्हापूरच्या उद्योगांचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. धांडे यांनी यावेळी सांगितले.