जिल्हा परिषदेच्या 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमास प्रतिसाद

जिल्हा परिषदेच्या 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमास प्रतिसाद

कोल्हापूर : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरूवात करण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक असा पवित्र समजला जातो. या अध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा या उद्देशाने 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढावा' हा उपक्रम कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी राबविला जातो. 

जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत गुढी पाडव्यादिवशी दाखलपात्र विद्यार्थी व त्यांचे पालक यांना अगत्यपूर्वक शाळेत आमंत्रित करावे, दाखलपात्र विद्यार्थ्यांचे यथोचित स्वागत करावे तसेच दाखलपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरुन त्यांचा शाळेतील प्रवेश निश्चित करणेबाबत कळविण्यात आले होते.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील ६ वर्षे पूर्ण वयोगटातील (दाखलपात्र) २६१८२ बालकांपैकी १५७३७ बालकांचा (६० टक्केपेक्षा जास्त) प्रवेश गुढी पाडव्यादिवशीच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झालेला आहे.

जिल्हा परिषदेच्या वि.मं. कणेरीवाडी, वि.मं.हसूर दुमाला, वि.मं. कुरुंदवाड नं.३, मराठी वि.मं. खिद्रापूर, वि.मं. म्हाकवे, वि.मं. सोनाळी, वि.मं. बोरवडे, वि.मं.शिनोळी, उर्दू वि.मं. चंदगड, केंद्रशाळा कोलोली, वि.मं. जाखले, वि. मं. खानापूर अशा अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी तर प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागल्या होत्या.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा 'गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा' हा उपक्रम राज्यात आदर्शवत असून इतर जिल्ह्यांमध्येही त्याचे अनुकरण केले जात आहे.