पाच गावातील प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र ऑगस्ट पूर्वी कार्यान्वित करण्याचे नियोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 4 गावांमध्ये प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र (प्लास्टीक वेस्ट मॅनेजमेंट युनिट) कार्यान्वित झाले असून उर्वरित 5 गावांमधील प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र 15 ऑगस्ट 2025 पूर्वी कार्यान्वित करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने केले आहे. प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र सुरु झालेल्या तालुक्यातील गावांमध्ये घरगुती स्तरावरुन प्लास्टीक संकलित व्हावे आणि संकलित केलेला कचरा प्लास्टीक प्रक्रिया केंद्राला देण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. 15 ऑगस्ट 2025 पूर्वी उर्वरित तालुक्यातील 8 प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्याची कार्यवाही या विभागामार्फत सुरु आहे, अशी माहिती जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी दिली आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमानता अभियान राबविले जात आहे. 1 मे ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत प्रशासकीय कामात गती यावी या अनुषंगाने सर्व विभागांमार्फत राबविण्यात येणा-या योजना, अभियान आणि उपक्रम यांना 15 ऑगस्ट 2025 पर्यंत साध्य निश्चितीसाठी कालावधी देण्यात आलेला आहे. पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर या विभागाने देखील मुख्यमंत्री प्रशायकीय गतीमानता अभियानामध्ये प्रत्येक तालुक्यातील प्लास्टीक कच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी तालुक्यातून एका गावाची निवड करुन प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र (प्लास्टीक वेस्ट मॅनेजमेंट युनिट) सुरु करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी 12 तालुक्यातील 9 गावांची निवड करण्यात आली असून 15 ऑगस्ट 2025 पूर्वी सर्व प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे.
वाटंगी (ता.आजरा) हसूरचंपू (ता.गडहिंग्लज) सरवडे (ता.राधानगरी) कोडोली (ता.पन्हाळा) या गावांमध्ये प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यातील सर्व प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र सुरु करण्यासाठी या अभियानांतर्गत कालबध्द नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व गावातील निर्माण होणारा प्लास्टीक कचरा संकलन करण्यासाठी मार्ग निश्चिती करण्यात आले आहेत. या मार्गावरुन नियमित प्लास्टीक संकलन केले जाते. संकलित केलेला कचरा प्रकल्प कार्यस्थळावर पोहोचल्यानंतर या प्लास्टीकचे वर्गीकरण करुन त्यावर प्रक्रिया (बेलींग, श्रेडींग) केली जाते. गावस्तरावरुन संकलित झालेल्या कचऱ्याची नोंदवही ठेवण्यात आली आहे. प्रक्रिया केल्यानंतरचे प्लास्टीक खासगी व्यावयायिकामार्फत पुर्नप्रक्रियेसाठी दिले जाते. पुर्नप्रक्रियेसाठी देण्यात आलेल्या प्लास्टीकची नोंद ही प्रक्रिया केंद्रावर ठेवण्यात आल्याची माहिती परीट यांनी दिली आहे.