... तर सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत जाणार : प्रकाश आंबेडकर

... तर सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत जाणार : प्रकाश आंबेडकर

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी जर उद्या वंचित बहुजन आघाडीला संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करु शकणाऱ्या पक्ष किंवा युती-आघाडीच्या सोबत राहणे पसंत करणार आहोत, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे.

सोशल मीडिया 'एक्स' वरून प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा निकाल उद्या स्पष्ट होणार आहे. वंचित बहुजन आघाडी या वेळी अनेक ठिकाणी जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जात आहे, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेत जाण्याचे संकेत दिले आहेत. 

भाजपवर केली होती टीका -

याआधी वंचितने भाजपवर टीका केली होती, तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचितने महाविकास आघाडीत येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वाटाघाटी करताना ताळमेळ न बसल्याने वंचितने निवडणूक स्वबळावर लढवली. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळवता आले नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकाही त्यांनी स्वबळावरच लढवली. विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार निवडून येतील असं बोललं जातंय. आता उद्याच काय होणार हे चित्र स्पष्ट होईल. विरारमध्ये विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप झाल्यानंतर वंचितने भाजपवर टीका केली होती. "विनोद तावडे विरारच्या एका हॉटेलमध्ये उघडपणे पैसेवाटप करत असल्याचे समोर आले आहे. पैशांची मोठी रक्कम त्यांच्याकडे आढळून आली आहे. भाजपचा चेहरा या निमित्ताने उघडा पडला आहे. पैशांच्या जिवावर निवडणुका जिंकता येतात, हे भाजपच्या वारंवार कृतीतून स्पष्ट होत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. लोकशाहीला मारक कृत्य भाजपकडून करण्यात येत आहेत" अशी टीकाही  प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

आठवलेंकडून 'ग्रीन सिग्नल' -

रिपब्लिकन ऐक्य होत असेल तर आपण प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार असल्याचं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. प्रकाश आंबेडकर वंचितांसाठी काम करतात हे चांगलं आहे.पण पक्षाला मान्यता मिळेल, इतकी मते त्यांना मिळत नाहीत. मागील तीन निवडणुकांत त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यांनी महायुतीसोबत यावे, त्यांचं याठिकाणी स्वागत आहे, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.