व्हीएसआय देणार स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार - समरजितसिंह घाटगे

व्हीएसआय देणार स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार - समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर - शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी सहकारी साखर कारखानदारीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून भागाचा व शेतकऱ्यांचा किती चांगल्या पद्धतीने विकास करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळेच कारखान्याचा देशपातळीवर नावलौकिक झाला. सहकारी साखर कारखान्यातील त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन दरवर्षी साखर उ‌द्योगात तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यास पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने "स्व. राजे विक्रमसिंह घाटगे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार" या राज्य पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली. 

स्व.राजेसाहेबांच्या रविवारी होणाऱ्या १० व्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पुरस्काराच्या निर्णयामुळे त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने कृतीशील श्रद्धांजली वाहिली असल्याचाही उल्लेखही घाटगे यांनी केला.  याबाबत माहिती देताना घाटगे पुढे म्हणाले,राज्यातील साखर कारखान्यांची शिखर संस्थाअसलेल्या व्हीएसआयमार्फत साखर उ‌द्योगात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना दरवर्षी बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येते. त्यामध्ये वरील पुरस्काराबाबतच्या 'शाहू'च्या प्रस्तावास या गळीत हंगामापासून त्यांच्या कार्यकारी समितीने मान्यता दिली आहे. हे शाहू परिवारातील सर्वच घटकांसाठी अभिमानास्पद आहे.

स्व.राजेसाहेब यांनी छत्रपती शाहू साखर कारखान्याची अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थापना केली.कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध नसताना प्रसंगी टँकरने पाणी आणून कारखाना चालविला. १२५० मे.टन गाळप क्षमतेवर सुरू झालेला हा कारखाना आता ८००० मे.टन दैनंदिन गाळप करीत आहे. सहवीज निर्मिती, इथेनॉल,बायोगॅस आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांचीही यशस्वीपणे उभारणी केली आहे. उच्चांकी ऊस दराबरोबर सभासद शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक नवनवीन पायंडे स्व. राजेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू साखर कारखान्याने पाडले. सहकारी साखर कारखानदारीतील त्यांचे कार्य अडचणीत असलेल्या कारखानदारीला आजही दीपस्तंभासारखे आहे.

यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी मंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.