अजित पवार गटाला मोठा धक्का; ए वाय पाटील यांचा राजीनामा?

अजित पवार गटाला मोठा धक्का; ए वाय पाटील यांचा राजीनामा?

कोल्हापूर (प्रतिनिधि) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक आनंदराव यशवंतराव तथा ए. वाय. पाटील यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिलाय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवलेल्या आपल्या राजीनाम्यात त्यांनी वैयक्तिक कारणे आणि पदाला वेळ देण्याच्या असमर्थतेचा उल्लेख केलाय. 

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे आणि पक्षाच्या नाट्यमय स्थितीमुळे पाटील यांचा हा राजीनामा धक्कादायक मानला जातो. त्यांच्या या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नक्कीच बदलली जाणारयत. दरम्यान, ए वाय पाटील हे गेल्या लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीला पाठींबा दिला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या शब्दावरून हा पाठिंबा दिल्याचं त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात येतंय. पाटील यांनी आपल्या मतदारसंघात संपर्क मेळावे देखील घेण्यास सुरवात केलीय. 

दरम्यान, बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून ना. हसन मुश्रीफ, बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार के पी पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालंय. निवडणुकीच्या काळात त्यांच्याकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टलरीवर कारवाई करण्यात आली होती. याचा परिणाम सुद्धा आगामी निवडणुकीत दिसून येणारय. त्यामुळे के पी पाटील आणि ए वाय पाटील हे मेहुणे-पाहुणे एकमेकांच्या विरोधात लढणार की एकत्र येऊन लढणार यावर राधानगरी मतदारसंघाची गणिते अवलंबून आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर हे महायुतीचे उमेदवार म्हणून लढणारयत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण लढणार याकडे साऱ्या जिल्ह्याचं लक्ष लागून आहे.