कंत्राटी नोकर भरती, शाळा खासगीकरण त्वरीत थांबवा

कंत्राटी नोकर भरती, शाळा खासगीकरण त्वरीत थांबवा

राधानगरी:- प्रतिनिधी विजय बकरे

 शासकीय, निमशासकीय सेवेत कंत्राटी नोकरी भरती करू नये, सरकारी शाळांचे खासगीकरण करू नये. सेवानिवृत्त शिक्षकांची दरमहा २० हजार रूपये मानधनावर नियुक्तीच्या धोरणास शिवसेना ठाकरे गट राधानगरी तालुका शाखेने तीव्र विरोध केला. तसेच खासगीकरणाचे धोरण तात्काळ रद्द करावे ,अन्यथा जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदन नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर यांना देण्यात आले.

शासकीय, निमशासकीय ठिकाणी आहे. कंत्राटी तत्वावर भरतीचे धोरण शासनाने अवलंबले आहे. त्यामुळे कंत्राटी कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल. पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरतीची भाषा करताना दुसऱ्या बाजूला कंत्राटी पद्धतीचा अवलंब हा विरोधाभास असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.

देणगी देणाऱ्यांचे नाव शाळांना पाच वर्षांसाठी द्यायचा डाव शासन खेळत आहे. शासनाने शाळांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांत शिक्षक भरती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात २० हजार रूपये मानधन देऊन रूजू करून घेतले जात आहे. ही पद्धत चुकीची आहे. सरकारी शाळा मोडीत काढून त्या धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न हाणून पाडू असा इशारा दिला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील ,शिवसेना महिला उपजिल्हा संघटक ,रंजना आंबेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख ओंकार आरडे, विभाग प्रमुख, विजय टिपुगडे प्रसाद डवर ,कोंडीबा टिपुगडे, जमीर तहसीलदार ,अनिल चौगुले, धनाजी टिपुगडे, आनंदा पाटील, रणजीत पाटील, मधुकर गुरव, ऋषिकेश पाटील ,पवन गुरव उपस्थित होते.