भारत सरकारचा मोठा निर्णय : " कोणताही दहशतवादी हल्ला म्हणजेच युद्ध समजलं जाईल"

नवी दिल्ली - पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच वाढला आहे. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने थेट भारताच्या सैनिकी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठा आणि निर्णायक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय सूत्रांनुसार, भविष्यात भारताच्या भूमीवर घडणारा कोणताही दहशतवादी हल्ला थेट भारताविरुद्धच्या युद्धासारखा मानला जाईल आणि त्याला तसंच उत्तर दिलं जाईल. या निर्णयामुळे भारताने दहशतवादाविरोधात अधिक आक्रमक आणि ठाम भूमिका घेतली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून सातत्याने घडवले जाणारे हल्ले भारताच्या सुरक्षेसाठी मोठं आव्हान ठरत आहेत. आतापर्यंत भारताने प्रत्येक हल्ल्याला उत्तर दिलं असलं, तरी अशा कारवाया थांबत नाहीत. त्यामुळे भारताने आपली धोरणं बदलून अधिक कठोर आणि रणनीती दृष्टीकोन स्वीकारला आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या घडामोडींविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "पाकिस्तानने पंजाबमध्ये हाय स्पीड क्षेपणास्त्र डागले असून श्रीनगर, अवंतीपुरा आणि उधमपूर येथील वैद्यकीय संस्थांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याला भारताने त्वरित आणि कठोर प्रत्युत्तर दिलं."
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, पाकिस्तानचं सैन्य सध्या सीमावर्ती भागात हालचाली करत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर भारताने घेतलेला निर्णय केवळ संरक्षणात्मक नव्हे, तर दहशतवादाविरोधातील दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे.