मिशन रोजगारच्या माध्यमातून युवापिढीला नोकरीक्षम बनविण्याचा प्रयत्न -आ. ऋतुराज पाटील

मिशन रोजगारच्या माध्यमातून युवापिढीला नोकरीक्षम बनविण्याचा प्रयत्न -आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. पण अनेकदा विविध स्किल्सच्या अभावामुळे युवा पिढी नोकरीच्या स्पर्धेत मागे पडते. त्यामुळे युवा पिढीला योग्य कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीक्षम बनविण्यासाठी 'मिशन रोजगार' रोजगाराच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले.

   आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील युवा पिढीसाठी ‘मिशन रोजगार’ अंतर्गत आयोजित केलेल्या ‘कॉर्पोरेट स्किल डेव्लपमेंट प्रोग्राम’च्या शुभारंभ प्रसंगी आमदार पाटील बोलत होते. यावेळी मोटीव्हेशनल स्पीकर आणि कॉर्पोरेट स्किल ट्रेनर प्रा. गणेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

आमदार पाटील म्हणाले,  मिशन रोजगाराच्या माध्यमातून युवा पिढीसाठी विविध उपक्रम राबवत आहोत. गतवर्षी ‘जॉब फेअर’च्या माध्यमातून  २५०  कंपन्यांच्या  सहभागातून तब्बल ७, ५००  युवक युवतींना नोकरीची  संधी मिळवून देऊ शकलो याचे समाधान आहे. स्किल असेल तर संधीसुद्धा आहेत. त्यासाठी आपल्यातील स्किल्स डेव्हलप करणे गरजेचे आहे. 

विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची  चांगली तयारी करता यावी, अभ्यास करता यावा , यासाठी कोल्हापुरात चार कोटीच्या निधीतून  ५ अभ्यासिका सुरू केल्या आहेत.  या माध्यमातून आपल्या घराजवळच अभ्यास करण्याची  संधी  युवा पिढीला मिळवून दिली आहे. शेंडा पार्क मधील जागा आयटी  पार्क विकसित करण्यासाठीही आमचे  प्रयत्न सुरू आहेत. युवकांच्या विकासासाठी, त्यांच्या करिअरसाठी जेवढे काही चांगले करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही आमदार पाटील यानी यावेळी दिली. 

प्रा. गणेश भोसले यांनी, उपस्थित युवक -युवतीना हार्ड स्किल, सॉफ्ट स्किल आणि लाईफ स्किल या संकल्पना समजावून सांगितल्या. स्वतःमधील कौशल्ये ओळखून  ती विकसित केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे शक्य आहे.

 कॉर्पोरेट क्षेत्रासाठी जबाबदारी स्वीकारणे आणि ताकदीने पूर्ण करणे हे सर्वात मोठे कौशल्य आहे. निर्णय क्षमता,  क्रिएटीव्ह कम्युनिकेशन आणि इमोशनल कोशंट वर भर दिल्यास करिअरमध्ये निश्चितच यश मिळेल. आपल्याकडे असलेल्या कौशल्यबाबत आत्मपरीक्षण करून ती अपस्केल, अपग्रेड करणे आवश्यक आहे. करियर प्लॅनिंग आणि स्किल्स प्लॅनिंग यांचा एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. 

प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी प्रास्ताविकात ‘मिशन रोजगार’ उपक्रम व त्या अंतर्गत राबवलेले उपक्रम, युवा पिढीसाठीच्या उपलब्ध केलेल्या संधी, विविध उपक्रम यांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपरत्न पवार, मृणाल भोसले यांनी केले. यावेळी प्रा.मकरंद काइंगडे, रोहन चौगले यांच्यासह युवक- युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.