चिमगाव उपकेंद्रामुळे कार्यक्षेत्रातील आठ गावांना नियमित व उच्च दाबाने वीज पुरवठा होईल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

चिमगाव उपकेंद्रामुळे कार्यक्षेत्रातील आठ गावांना नियमित व उच्च दाबाने वीज पुरवठा होईल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

चिमगाव प्रतिनिधी : चिमगाव ता. कागल येथील वीज उपकेंद्रामुळे कार्यक्षेत्रातील कार्यक्षेत्रातील चिमगावसह अवचितवाडी, शिंदेवाडी, दौलतवाडी, यमगे, करंजीवने, हळदवडे व हळदी या आठ गावांना ज्यादा दाबाने नियमित वीज पुरवठा होईल. विजेची गळती कमी होऊन विजेची बचतही होईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 

   

          

चिमगांव ता. कागल येथील ३३ /११ के. व्ही. चिमगांव उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिपक आंगज होते. 

            

भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सध्या देशात सौरउर्जेला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी सोलर पॅनेलची योजना कार्यान्वित झाली असून शेतकऱ्यांनी व नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. संपूर्ण जगासाठीच ऊर्जेचा सूर्य हा एक फार मोठा आणि चिरंतन खजिना आहे. जगाचे व देशाचे चित्र यामुळे पालटून गेले आहे. सोलर पॅनेलने आपली नवी टेक्नॉलॉजी सिद्ध केली आहे. सरकारने मागेल त्याला सोलर पॅनल देण्याची योजना आणली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले .  

             

कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच दीपक आंगज यांनीही मनोगत व्यक्त केले .

                       

यावेळी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, दिग्विजय सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे माजी संचालक नारायणराव मुसळे, सर्जेराव अवघडे, रणजीत सूर्यवंशी, नामदेव एकल, उपसरपंच सौ. चौगले, माजी सरपंच तानाजी एकल, राजू आमते, नामदेव भांदिगरे, अमर देवळे, भडगावचे सरपंच बी. एम. पाटील, दौलतवाडीचे माजी सरपंच विठ्ठल जाधव उपस्थित होते.

          

स्वागत शरदकुमार संकपाळ यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता भणगे यांनी केले. आभार शहर अभियंता प्रकाश पाटील यांनी मानले.

         

थोरले महाराज असते तर........

मंत्री मुश्रीफ म्हणाले, या उपकेंद्रास जागा मिळण्यात अडचणी आल्याची माहिती सरपंच दीपक आंगज यांनी भाषणात दिली. त्यांनी ही अडचण याआधीच जर मला सांगितली असती तर मुरगूडमध्ये महाराजांची भरपूर जमीन आहे. आपण मागणी करून त्यांच्याकडून ती घेतली असती. मुरगुडमध्ये अधिपतींची एवढी जमीन असतानाही सब स्टेशनला जागा मिळू शकली नाही, याचे आश्चर्य वाटते. थोरले महाराज असते तर त्यांनी या कामाकरिता कधीच जागा दिली असती, असेही ते म्हणाले.