धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राधाकृष्ण विखे पाटलांच सूचक वक्तव्य, म्हणाले...

सोलापूर: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा खास समजला जाणारा वाल्मिक कराडच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल नसला तरी तेच याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. गेली अनेक वर्षे ते बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे व्यवस्थापन करत आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही, असे बोलले जाते. मात्र, याच 'राईट हँड'मुळे आता धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.
यावरूनच आता भाजप आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. सरपंच हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतरच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल असं विखे पाटील म्हणालेत. त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत का? याची चर्चा सुरू झाली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूरमध्ये बोलताना याविषयी भाष्य केले. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करुन आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल. हा एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.