पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारचा मोठा निर्णय : पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेल्सवर बंदी, शोएब अख्तरलाही दणका

नवी दिल्ली: जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाच्या शिफारशीनंतर भारताने पाकिस्तानातील १६ प्रमुख यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. या चॅनेल्समध्ये माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर तसेच डॉन न्यूज, एआरवाय न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज यांसारख्या मोठ्या मीडिया संस्थांचा समावेश आहे.
या कारवाईचे कारण म्हणजे भारताविरोधात प्रक्षोभक, सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील आणि खोटी माहिती पसरवणे. या चॅनेल्सचे एकत्रितपणे ६३.०८ दशलक्ष म्हणजेच ६.३ कोटींहून अधिक सबस्क्राइबर आहेत. जिओ न्यूजकडे सर्वाधिक, म्हणजे १८.१ दशलक्ष (१.८ कोटी) सबस्क्राइबर आहेत, तर एआरवाय न्यूज आणि समा टीव्हीच्या अनुक्रमे १४.६ आणि १२.७ दशलक्ष सबस्क्राइबर आहेत.
भारत सरकारने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे पाकिस्तानच्या मीडियाला मोठा धक्का बसला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर दडपशाही वाढवण्याचे संकेत दिले आहेत.