Pakistan Pahalgam Terror Attack : हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया समोर

Pakistan on Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केला. “आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो,” असं म्हणतानाच त्यांनी वादग्रस्त विधान करत या हल्ल्यामागे भारतातील लोकांचा हात असल्याचा आरोप केला.
ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं की, भारतात सध्या सरकारविरोधात असंतोष वाढतोय. नागालँडपासून मणिपूर आणि काश्मीरपर्यंत लोक सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात उठून उभे राहत आहेत. “भारत सरकार अल्पसंख्याक बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यावर अन्याय करत आहे. त्यांच्या अधिकारांची हत्या केली जाते. लोक बंड करत आहेत,” असं त्यांनी म्हटलं.
पंतप्रधानांची तातडीची बैठक
या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाहून परतताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह तातडीची बैठक घेतली. या बैठकीत पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
अधिकार्यांच्या माहितीनुसार, पहलगाममधील हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात दोन परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. यात एक संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि दुसरा नेपाळमधील असल्याचं पुढे आलं आहे. अनेकजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.