पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांना मत हीच कै. गणपतराव फराकटे तात्यांना श्रद्धांजली : मनोजभाऊ फराकटे

पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांना मत हीच कै. गणपतराव फराकटे तात्यांना श्रद्धांजली : मनोजभाऊ फराकटे

कागल प्रतिनिधी : स्वर्गीय कै. गणपतराव फराकटे- तात्या यांनी लोकनेते पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची पाठराखण संपूर्ण आयुष्यभर केली. पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांना मत हीच स्वर्गीय कै. गणपतराव फराकटे - तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे यांनी केले. ज्याप्रमाणे कै. तात्यांचे अगदी आबालवृद्धांपर्यंत घरोघरी ऋणानुबंध होते, त्याचप्रमाणे मंत्री श्री. मुश्रीफ यांचेही घरोघरी ऋणानुबंध आहेत, असेही ते म्हणाले. 

       

 

बोरवडे ता. कागल येथील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जाहीर प्रचार सभेत श्री. फराकटे बोलत होते. अध्यक्षस्थानी जोतिराम साठे होते.

            

श्री. फराकटे पुढे म्हणाले, हसन मुश्रीफ आणि बोरवडे गावचे ऋणानुबंध घट्ट आहेत. त्यांच्या प्रत्येक निवडणूकीत सातत्याने बोरवडे गावाने आणि बिद्री बोरवली जिल्हा परिषद मतदार संघाने पाठराखण केली. मुश्रीफ गटाचे नेते व आपले वडील स्वर्गीय गणपतराव फराकटे यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत असून आजपर्यंत जेवढे मताधिक्य मिळाले होते त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य बोरवडे गावातून ना. मुश्रीफ यांना मिळेल. गणपतराव तात्यांची पोकळी कधीच भरुन न येणारी असली तरी जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांची उणीव भासू देणार नाही.

       

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पंचवीस वर्षांच्या काळात देशातील सर्वाधिक विकासनिधी कागल मतदारसंघात आणला. या काळात लोकांच्या भल्याचा विचार करुन त्यांच्या सुखदुःखात सामील झालो. एकीकडे समर्पित भावनेने काम करणारा माझ्यासारखा उमेदवार असताना दुसरीकडे चांगल्या योजनांना खो घालणारा आणि आडकाठी आणणारा कपटी उमेदवार आपल्यासमोर उभा आहे. मी लोकांच्या चुली पेटवून त्यांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करत असताना विरोधी उमेदवार मात्र गोरगरीबांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम करत आहे. जनतेने अशा बिनकामाच्या उमेदवारापेक्षा माझ्यासारख्या कामाच्या उमेदवाराला निवडून द्यावे. 

     

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे, अंबरीससिंह घाटगे, माजी पं. स. सदस्य रघुनाथ कुंभार, आनंदराव साठे, प्रा. मधुकर पाटील, विजय काळे, बाळासाहेब फराकटे, यांनी मनोगते व्यक्त केली. 

केडीसीसीचे संचालक भैय्या माने, भूषण पाटील, आनंदराव साठे, आनंदराव फराकटे, डी. एम. चौगले, सुनीलराज सुर्यवंशी, जयदीप पोवार, साताप्पा साठे, तानाजी साठे, सुनील मगदूम, तानाजी जमणिक, अशोक फराकटे, बाळासाहेब फराकटे, के. के. फराकटे, ज्ञानदेव फराकटे, प्रदिप कांबळे, एकनाथ चव्हाण, कृष्णात फराकटे, उपसरपंच विनोद वारके, विनायक जगदाळे, सुनील घोडके यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

स्वागत अशोक कांबळे यांनी केले. आभार उपसरपंच विनोद वारके यांनी मानले.

*त्यांना तांदळातील खड्यासारखे बाजूला करा*

गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यात विधानसभेच्या सहा निवडणूका झाल्या. या सर्व निवडणूका वैचारिक पातळीवर लढवल्या. कधीही द्वेषाची लढाई केली नाही. सध्या मात्र दर्जाहीन राजकारण सुरु असून जनतेत बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्री मुश्रीफ यांनी जातीधर्माच्या भिंती भेदून सर्वधर्म समभाव जपला असताना जातीपातीच्या कुबड्या घेऊन द्वेषाचे राजकारण करणाऱ्या विरोधी उमेदवाराला तांदळातील खड्यासारखे बाजूला करा.