महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी - अमल महाडिक

महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी - अमल महाडिक

 कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हयात जुलै २०२४ मधील अतिवृष्टीने आलेल्या महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे २०१९-२० या सालाप्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करण्याची विनंती माजी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

         कोल्हापूर जिल्हयात या महापूरामुळे शेतकऱ्यांच्या ऊस व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच व्यापार, उद्योग, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांच्या राहत्या घरांची पुराच्या पाण्यामुळे पडझड होवून नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना देखील जास्तीत-जास्त आर्थिक मदत होणे गरजेचे आहे.

         या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना सन २०१९-२० मध्ये आलेल्या महापूरावेळी ज्याप्रमाणे पंचनामे झाले त्याचप्रमाणे याही वेळेस पंचनामे करून शासनामार्फत त्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करणे आवश्यक असल्याचे महाडिक यांनी मुख्यंत्र्यांची भेट घेऊन सांगितले. 

*शासनामार्फत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर रोख स्वरूपात मोबदला मिळावा यासाठी सर्व स्तरावर माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. - अमल महाडिक*