राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं मोठं वक्तव्य, शिवाजी महाराज नसते तर माझं नाव...

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं मोठं वक्तव्य, शिवाजी महाराज नसते तर माझं नाव...

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर माझे नाव दुसरेच काहीतरी असते, असे विधान राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले. शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या हस्ते उत्साहात झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना राधाकृष्णन म्हणाले, मी फक्त सहा वर्षांचा असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल शिकलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोर, तंजावर, गिंजी (सेनजी) आणि तामिळनाडूतील इतर काही ठिकाणी भेट दिल्या. मला त्यांचा अभिमान आहे. कारण केवळ त्यामुळेच मी आज तुमच्यासमोर सी. पी. राधाकृष्णन म्हणून उभा आहे. अन्यथा माझे नाव दुसरे काहीतरी असते. मी आज जेव्हा कोल्हापुरात दाखल झालो. तेव्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने अनेक पुस्तके दिली. यापैकी एक पुस्तक एका परदेशी नागरिकांने लिहिलेले होते. यामध्ये त्याने शिवाजी महाराजांचा उल्लेख महान बंडखोर असा केला आहे. पण, शिवाजी महाराज हे बंडखोर नव्हते, तर ते महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी परदेशी आक्रमणाविरोधात लढा दिला. यापैकी एक मुघल आणि त्यानंतर ब्रिटिश होते. त्यामुळे शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे राजे नव्हते तर ते खऱ्या अर्थाने भारत मातेचे राजे होते.

यावेळी सीएसआयआर - एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले प्रमुख पाहुणे म्हणून आणि महाराष्ट्राचे मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. मंचावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते.