सरपंच राजा आणि आर एक्स बैज्या बैलजोडी, सतेज - ऋतु बैलगाडी शर्यत स्पर्धेची मानकरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - हुर्र.... म्हणताच वाऱ्याच्या वेगाने धावणारी बैलं आणि एका पेक्षा एक सहभागी झालेल्या बैल जोड्या डोळ्याचे पारणे फेडणारी अशी सतेज ऋतू भव्य बैलगाडी शर्यत लाखो शौकिनांच्या उपस्थितीत पार पडली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या बैलगाडी शर्यत नेर्ली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. पाचगाव येथील संभाजी गाडगीळ यांच्या आरएक्स बैज्या आणि युवराज शिंदे यांच्या सरपंच राजा बैलजोडी सतेज - ऋतु बैलगाडी शर्यत स्पर्धेची मानकरी ठरली.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर दक्षिण शर्यत शौकीनच्यावतीने नेर्ली येथे, पश्चिम महाराष्ट्रातील सतेज - ऋतू भव्य बैलगाडी स्पर्धा, आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचा यावेळी भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
या बैलगाडी शर्यतीत सर्जा, राजा, बुलट छब्या, सांगोला राज्या अशी अनेक बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या. बैलं मालकांनी हुर्र.... म्हणताच वाऱ्याच्या वेगाने धावणारी बैल आणि तितकाच बैलगाडी शर्यत शौकिनांचा प्रतिसाद अशा अभूतपूर्व आणि थरारक उत्साहात या बैलगाडी शर्यती पार पडल्या. या बैलगाडी शर्यतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 2 लाखांहून अधिक बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती. पाचगाव येथील संभाजी गाडगीळ यांच्या आरएक्स बैज्या आणि युवराज शिंदे यांच्या सरपंच राजा बैलजोडी सतेज - ऋतु बैलगाडी शर्यत स्पर्धेची मानकरी ठरली. या बैलजोडीने या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. तर महेश बोंद्रे यांच्या बुलेट छब्या आणि शिवाजी मेटकरी यांच्या सांगोला राजा बैलजोडी द्वितीय तर पाटील डेअरी यांच्या फुल्या आणि अमोल घागरे यांच्या कॅडबरी ही बैल जोडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, बैलगाडी शर्यत ही, ग्रामीण भागाची परपंर आहे. ही परंपरा टिकवायच कामं, अशा शर्यतीच्या माध्यमातून होत आहे त्याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील वर्षी या स्पर्धा आणखी भव्य स्वरूपात घ्यावात, त्यासाठी प्रथम क्रमांकासाठी ट्रॅक्टर बक्षीस देण्याचे आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केले. याशिवाय अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात झालेल्या स्पर्धा मुळ भारावून गेलो. असे उद्गारही त्यांनी काढले. बैलगाडी शर्यतीचे हे मैदान मारलय, आता भविष्यात ज्या- ज्यां निवडणूका येतील त्याच मैदान मारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी अशी ऐतिहासिक स्पर्धा संपन्न झाली. शेतकरी आपल्या जिवापेक्षाही बैलांना जास्त जपतो.. शिवाय ग्रामीण भागाची परंपरा आणि बाज कायम ठेवण्यासाठी, पुढील वर्षीही अशा स्पर्धा भव्य स्वरूपात घेऊया. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही आ. पाटील यांनी दिली.
यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, सांगवडेवाडी सरपंच सुदर्शन खोत, कणेरी सरपंच निशांत पाटील, पाचगाव चे माजी सरपंच संग्राम पाटील, माजी सरपंच शशिकांत खवरे, नेर्ली उपसरपंच निखिल पाटील बिद्री कारखान्याचे संचालक आर एस कांबळे, नारायण गाडगिळ, सागर पाटील, गजानन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.