आचार्य श्री विशुद्धसागरजी यांना संजय घोडावत विद्यापीठाची मानद 'डॉक्टरेट' जाहीर
कोल्हापूर : परमपूज्य, अध्यात्मयोगी आचार्य १०८ श्री विशुद्धसागरजी महाराज यांना संजय घोडावत विद्यापीठाची “मानद डॉक्टरेट” पदवी संजय घोडावत विद्यापीठाच्या दिनांक ०१ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या ६ व्या पदवीदान समारंभाच्या वेळी प्रदान केली जाणार आहे असे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी जाहीर केले आहे.
विशुद्धसागरजी यांचे उल्लेखनीय कार्य, २०० प्रकाशित पुस्तके, ११ लाख ५० हजार श्लोक आणि ५००० कविताद्वारे त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. साहित्यातील त्यांचे योगदान विशेषता जैन आदर्श आध्यात्मिक मुक्तीचा शोध आणि धर्मग्रंथावरील भाष्याप्रती वाढ, भक्ती व्यक्त करणाऱ्या त्यांच्या असंख्य कविता आणि स्तोत्रांमुळे भारतीय अध्यात्मिक परंपरेबद्दलची आमची समज लक्षणीयरीत्या समृद्ध झाली आहे आणि त्यात लक्षणीय भर पडली आहे.
विशुद्धसागरजी यांनी जनसामान्यांमध्ये अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी आणि समाजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी अनवाणी पायाने भारतभर हजारो किलोमीटरचा प्रवास करून समाजात शांतता, बंधुता आणि एकता पसरविण्यास त्यांचे मदत कार्य चालू आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रातील उन्नतीसाठी देशभरात अनेक शैक्षणिक केंद्र, मंदिर आणि ग्रंथालयाची स्थापना केलेली आहे. सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य आणि देशात सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्यसाठी ही “मानद डॉक्टरेट” पदवी संजय घोडावत विद्यापीठाच्या ६ व्या पदवीदान समारंभाच्या वेळी प्रदान करण्याचे आयोजित करण्यात आलेले आहे.
आचार्य १०८ श्री विशुद्धसागरजी यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी प्रदान करण्याच्या निर्णय कमिटीला संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आचार्य १०८ श्री विशुद्धसागरजी यांना संजय घोडावत विद्यापीठाची “मानद डॉक्टरेट” पदवी जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी शिरोळ मतदार संघाचे माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक स्वामी नांदणी, राजेश घोडावत, युवराज शहा, विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.