"केंद्रात दोन अतृप्त आत्मे", संजय राऊतांचा हल्लाबोल..

"केंद्रात दोन अतृप्त आत्मे", संजय राऊतांचा हल्लाबोल..

 मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदींनी रविवारी पंतप्रधानपदाची त्यांच्याबरोबर जवळपास ७० खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षालाही काही मंत्रीपदे देण्यात आली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख भटकता आत्मा असा केला होता. त्यानंतर या विधानावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आता केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं. यामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू सहभागी झाले आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका करत “केंद्र सरकारमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन अतृप्त आत्मे आहेत”, असा हल्लाबोल राऊतांनी केला.

संजय राऊत काय म्हणाले?

“लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भटकती आत्मा सुरु होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. आता केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मे आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोन अतृप्त आत्मे आहेत. आधी त्यांच्या अतृप्त आत्म्याचं समाधान मोदींनी करावं. शरद पवारांनी म्हटलं आहे की भटकती आत्मा कोणाला सोडणार नाही. आता जोपर्यंत नरेंद्र मोदींना पदावरून खाली खेचणार नाहीत, तोपर्यंत आमचा आत्मा शांत राहणार नाही. सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना त्या दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.