.... तर महापुरावर काय उपाययोजना केल्या- खा. शाहू छत्रपती, आ. सतेज पाटील

.... तर महापुरावर काय उपाययोजना केल्या- खा. शाहू छत्रपती, आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापुराबाबत वडनेरे समितीचा अहवाल राज्य सरकारने मान्य केला आहे काय? असेल तर त्यामध्ये महापुर येऊ नये याकरिता सुचवलेले उपाय काय आहेत आणि त्यावर अंमबजावणी काय केली? अशी विचारणा खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली. या पत्रावर आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर आमदार रोहीत पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्या सह्या आहेत. 

अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आंदोलन केले. मात्र, यासंदर्भात आयोजित केलेल्या दोन्ही बैठकांना महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले नसल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ९ लोकप्रतिनिधींनी अलमट्टीबाबत राज्य सरकारची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट करण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे. 

पत्रात म्हटले आहे, ११ मार्च २०२५ रोजी आमदार अरुण लाड यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याला विरोध करण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे असे जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले का? अलमट्टी धरणाबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाड्रोलॉजी रुरकी उत्तराखंड या संस्थेने केलेल्या अभ्यास अहवालाची प्रत अद्यापही राज्य सरकारला मिळाली का नाही याचा खुलासा करा, कृष्णा पाणीवाटप लवादानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास आलेले पाणी हे कमी आहे, हे अन्यायकारक आहे. त्याचे फेरवाटप होण्यासाठी राज्याने पाठपुरावा करावा, केंद्र सरकारकडे सांगली कोल्हापूर भागातील जनतेने गेल्या एक महिन्यापासून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्या संदर्भात अंदाजे ३००० हरकती नोंदवल्या आहेत. त्याबाबत केंद्र सरकारने काय भुमिका घेतली त्याबाबतीत राज्यसरकारने पत्र व्यवहार केला आहे काय ? नसल्यास का केला नाही ?, याचा खुलासा करा, अशा मागण्या करण्यात आल्या.