तीच तारीख, तीच पद्धत;एकाच कुटुंबातील पाच जणांचे सापडले मृतदेह

तीच तारीख,  तीच पद्धत;एकाच कुटुंबातील पाच जणांचे सापडले मृतदेह

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या अलिराजपूरमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले असून, हे प्रकरण हत्येचं आहे की आत्महत्येचं, याचा तपास सुरु आहे. विशेष म्हणजे, १ जुलै २०१८ रोजी दिल्लीच्या बुराडी परिसरातही अशाच प्रकारे एका कुटुंबातील ११ सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. आता त्याच दिवशी आणि त्याच पद्धतीने एका कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडले आहे. 

 बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरणाची सविस्तर माहिती : 

१ जुलै २०१८ रोजी दिल्लीच्या बुराडी परिसरात एका कुटुंबातील ११ सदस्यांचे मृतदेह त्यांच्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले होते. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. मृतांमध्ये तीन पिढ्यांचे सदस्य होते, ज्यात पुरुष, महिला आणि मुलं यांचा समावेश होता.

भाटिया कुटुंबातील ११ सदस्यांचे मृतदेह त्यांच्या घरात सापडले, त्यापैकी बहुतेकांनी छताच्या लोखंडी सळईला गळफास लावले होते.घरातील सर्व लोकांचे डोळे आणि तोंड बांधलेले होते.काही सदस्यांची हातंही बांधलेली होती.एका सदस्याच्या शरीरावर गळफासाचा पुरावा सापडला नाही, मात्र ती वृद्ध महिला पलंगावर मृतावस्थेत सापडली होती. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता वर्तवण्यात आली होती, पण संशयास्पद परिस्थितीमुळे हत्येचाही संशय होता.