महापालिकेच्या संथगतीच्या कार्यपद्धतीवर क्षीरसागर यांचा ठपका
![महापालिकेच्या संथगतीच्या कार्यपद्धतीवर क्षीरसागर यांचा ठपका](https://majhamaharashtra.in/uploads/images/202406/image_750x_66683ac89baf3.jpg)
कोल्हापूर प्रतिनिधी : आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पूरस्थिती आढावा, राजाराम बंधारा नवीन पुलाचे काम, झोपडपट्टी कार्डधारक, मनपा विकास निधी या विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली. या बैठकीत महापालिकेच्या संथगतीने होणाऱ्या कार्यपद्धतीवर श्री.क्षीरसागर यांनी ठपका ठेवला. विकास कामात अडथळे आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करा. कामे वेळेत पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेचीच असून, कार्यपद्धती सुधारून नागरिकांना न्याय द्या, अशा सूचना क्षीरसागर यांनी या बैठकीत दिल्या. तसेच कोल्हापूर शहराला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देताना पुढील आचारसंहितेच्या आत प्रलंबित सर्व विकास कामे पूर्ण करून नव्याने मंजूर निधीच्या वर्क ऑर्डर तात्काळ काढून कामे सुरु करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती अडसूळ, आपत्ती व्यवस्थापनचे संकपाळ, महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे, जलसंपदा कार्यकारी अभियंता श्रीमती माने, अतिरिक्त आयुक्त श्री.रोकडे, माजी नगरसेवक दिलीप पवार उपस्थित होते.