Kalyan News : ‘मम्मी गेली...’ चिमुकलीचा आक्रोश; कल्याण दुर्घटनेत हृदयद्रावक दृश्य

कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात मंगळवारी एक भीषण दुर्घटना घडली. येथे श्री सप्तशृंगी या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन वर्षांची चिमुरडी, वृद्ध महिला आणि इतर तरुणांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
दुर्घटनेत विशेष लक्ष वेधून घेतला तो १४ वर्षांच्या श्रद्धा साहूचा आक्रोश, जी खिडकीतून रडत "मम्मी गेली..." असं ओरडत होती. तिच्या समोरच तिच्या आईचा मृत्यू झाला होता. ही दृश्य ऐकणाऱ्या आणि पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. अग्निशमन दलाने तिला सुखरूप बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दुर्घटनेचं मूळ कारण इमारतीच्या चौथ्या मजल्यावर बेकायदेशीर लादीच्या कामामुळे झालेल्या तड्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळपास ३५ वर्ष जुन्या या इमारतीत ५० कुटुंबं राहत होती, मात्र तरीही ही इमारत अधिकृतपणे धोकादायक घोषित करण्यात आलेली नव्हती, हे विशेष लक्षवेधी आहे.
मृतांची नावं पुढीलप्रमाणे: प्रमिला साहू (५८),मनस्वी शेलार (२ वर्षे) ,सुनीता साहू (३७), सुजाता पाडी (३२), सुशीला गुजर (७८), व्यंकट चव्हाण (४२) हे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले असून श्रद्धा साहू (१४), अरुणा गिरनारायन (४८), श्रावील शेलार (४ वर्ष), विनायक पाडी (४.५ वर्ष), यश क्षीरसागर (१३), निखिल खरात (२६) हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.
सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तपास सुरू करीत आहेत. ही दुर्घटना शहरातील जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.