अलिबागमध्ये सावित्रीऐवजी सत्यवानानेच केली अशी अनोखी वटपौर्णिमा साजरी

अलिबाग - रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या प्रवेशद्वारावर असलेल्या रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. या खड्ड्यांकडे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या निष्क्रियतेकडे लक्ष वेधण्यासाठी अलिबागमधील काही तरुणांनी आगळा - वेगळा मार्ग स्वीकारला. त्यांनी खड्ड्यांमध्ये वडाचं रोपण करत वटपौर्णिमा साजरी करत अनोखं आंदोलनही या माध्यमातून केलं.
वटपौर्णिमेला महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. मात्र, अलिबागमध्ये उलट चित्र पाहायला मिळालं. इथे खड्ड्यांमुळे 'सत्यवान' चं आयुष्य धोक्यात असल्याने 'सावित्री' ऐवजी सत्यवानानेच खड्ड्यात वड लावून त्याला प्रदक्षिणा घातली. या कृतीमुळे प्रशासन जागं होईल, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
या रस्त्यांवरील खड्डे अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत, आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी, महिला आणि अन्य नागरिक जखमी झाले आहेत. अपघात टाळण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने स्थायी उपाय केलेले नाहीत. केवळ तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेली जाते, आणि काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडतात.
या समस्येच्या पार्श्वभूमीवर अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक आणि 'सिंडिकेट ग्रुप ऑफ अलिबाग' यांनी आपल्या खर्चाने रस्ता दुरुस्त करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, संबंधित खात्याकडून त्यांना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल तसेच सुरू आहेत.
विशेष बाब म्हणजे, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी याच रस्त्याचा वापर करूनही याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका नागरिकांतून होत आहे. या रस्त्याचा भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याबाबतही प्रशासनाला स्पष्ट माहिती नसल्याने समस्या कायमस्वरूपी सुटलेली नसल्यामुळे स्थानिकांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.