'कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !' अभियान जिहयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार – कार्तिकेयन एस.

कोल्हापूर - ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावीपणे राबविणेसाठी लोाकांच्यामध्ये, स्वच्छते विषयक वर्तणुकीत बदल घडवून आणने, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे, घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने १ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत 'कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !' अभियान कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.
गावात बांधकाम करण्यात आलेल्या नाडेपच्या माध्यमातून सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून खत निर्मिती करण्याकरीता राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने 'कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !' अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहे. ग्रामपंचायत स्तरावर घरगुती व सार्वजनिक स्तरावर वर्गीकरण केलेल्या ओल्या कचऱ्याचे २७ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये संकलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे ला 'कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !' या मोहिमेचा शुभारंभ होईल. यावेळी स्थानिकस्तरावर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थित राहणार आहेत. १ मे ते १० मे या कालावधीत गावातून संकलीत केलेला ओला कचरा नाडेप मध्ये भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मितीनंतर १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरपर्यंत नाडेप मध्ये तयार झालेले खत उपसण्याची प्रक्रिया होईल. सदर अभियान राबविणेबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) यांना राज्य स्तरावरील व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे अति. अभियान संचालक यांनी मार्गदर्शन केले आहे. यामध्ये अभियानाची पुर्वतयारी व नियोजन याबाबत माहिती देणेत आली आहे.
अभियानाची पडताळणी
१३८ दिवसाच्या 'कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !' या मोहिमेची पडताळणी जिल्हास्तरावरून प्रकल्प संचालक, जजीमि तथा जिल्हा समन्वयक स्वभामि (ग्रा.), गटविकास अधिकरी, दोन विस्तार अधिकारी, जिल्हा सल्लागार, तालुकास्तरावरील समन्वयक व गट समन्वयक ओल्या कऱ्यापासून भरलेल्या नाडेप खड्डयाची पडताळणी करतील.
प्रचार व प्रसिध्दी, समुदाय सहभाग व श्रमदान
जास्तीत जास्त गावामध्ये ही मोहीम राबविण्यासाठी १ मे पासून सुरू होणाऱ्या याअभियानाची प्रचार प्रसिध्दी स्थानिक वर्तमानपत्र व समाज माध्यम (सोशल मिडीया) मध्ये करण्यात येईल. तसेच यशोगाथा प्रकाशित करून इतर गावांना प्रेरित करण्यात येणार आहे. अभियानाकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था, बचतगट महिला व शेतकरी गटांचा सहभाग घेऊन गावपातळीवर श्रमदान उपक्रम राबवून जनसहभाग घेतला जाणार आहे.
अभियानाची सूचना व पूर्व तयारी
राज्यस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार, गटविकास अधिकारी, पं. स. स्तरावर ग्राम पंचायत अधिकारी यांची कार्यशाळा, बैठक आयोजित करतील. त्यानंतर ग्राम पंचायत अधिकारी हे ग्रामस्थांना माहिती देतील. तसेच गावात दवंडी दिली जाणार आहे. तसेच ग्रा.पं. कार्यालय, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, सोसायटी, तलाठी सज्जा, सार्वजनिक सुचना फलक या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येणार आहे.