कोल्हापूर कचरामुक्त करण्यासाठी स्वच्छतेची घेतली प्रतिज्ञा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लाभलेला समृद्ध जिल्हा आहे. मात्र काही वर्षात जिह्यात वाढलेले औद्योगिककरण, नागरीकरण , वाढती लोकसंख्या यामुळे घनकचरा व्यवस्थापनाची समस्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये निर्माण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने सातारा- कोल्हापूर महामार्ग शेजारी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत मुख्य मार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचलेले पाहावयास मिळत आहेत.
कोल्हापूर शहरात बाहेरून येणारी प्रमुख व्यक्ती असो (VIP) किंवा पर्यटनासाठी येणारे पर्यटक असो यांच्या नजरेस ही कचऱ्याची अस्वच्छ ठिकाणे येत आहेत.
कचरा साचलेली हि ठिकाणे ,स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर साठी अडथळा ठरत आहेत हे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या निदर्शनास आले. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सुचनेनुसार तालुका करवीर आणि तालुका हातकणंगले मधील संबंधित ग्रामपंचायतीमधील कचरा साचलेली ठिकाणे, Legacy Waste Sites निश्चित करणेत आली आहेत.
या ठिकाणामध्ये करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत शिये, नागदेवाडी, बालींगा, आंबेवाडी, चिखली, कंदलगाव, उचगांव, कळंबे तर्फ ठाणे, गोकुळ शिरगांव, मोरेवाडी, पाचगांव, गांधीनगर या 12 गावांचा तर हातकणंगले तालुक्यातील टोप व शिरोली या 2 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
कचरा साचलेली निश्चित केलेली ठिकाणे कायमस्वरूपी कचरा मुक्त करण्यासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. ,यांच्या अध्यक्षतेखाली कचरा ठिकाणे निश्चित केलेल्या गावातील सरपंच महोदय व ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक आज जिल्हा परिषद कोल्हापूर येथे घेणेत आली.
यावेळी कचरा साचलेली ठिकाणे स्वच्छ करणेसाठी विविध पर्यायावर चर्चा करणेत आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साचलेल्या कचऱ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वच्छ आणि सुंदर प्रतिमेस बाधा येत असुन आपल्या गावातील हि कचरा साचलेली ठिकाणे कायमस्वरूपी स्वच्छ आणि कचरा मुक्त करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित सरपंच, सदस्य यांना केले. तसेच या उपक्रमासाठी मदत व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल असे सांगितले. या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित सरपंच, सदस्य यांनी सदरची ठिकाणे स्वच्छ करण्याचा निर्धार यावेळी केला.
*स्वच्छतेची घेतली प्रतिज्ञा -*
कचरा साचलेली ठिकाणे कायमस्वरूपी स्वच्छ करणेचा निर्धार केले नंतर , मुख्य कार्यकारी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक , अधिकारी, कर्मचारी यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली .
याबैठकीला सरपंच, ग्रामसेवक यांनी गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याबाबत असणा-या अडचणी आणि समस्या मांडल्या. याबाबत माधुरी परीट ,प्रकल्प संचालक तथा जिल्हा समन्वयक, यांनी स्वच्छ भारत मिशन ग्रा. अंतर्गत असणारी कामे व उपाय योजना बाबत बैठकीमध्ये मार्गदर्शन केले. यावेळी विजय यादव, गट विकास अधिकारी करवीर, शबाना मोकाशी, गट विकास अधिकारी हातकणंगले उपस्थित होते.