जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या बरोबरीने कलागुणांची जोपासना करणे गरजेचे - खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सध्याच्या युगात प्रचंड स्पर्धा आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या बरोबरीने कलागुणांची जोपासना करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी नवी पिढी घडवण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून काम करावं, त्यातून भविष्यात भारत देश जागतिक पातळीवर महासत्ता बनेल, असे मत खा. धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील प्रवेशोत्सव उपक्रम वडणगेमध्ये राबवण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नव्या शैक्षणिक वर्षात, शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी १०० शाळांना भेटी देणे, असा निर्णय बैठकीत घेतला आहे. या उपक्रमांतर्गत खा. धनंजय महाडिक यांनी करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या शिवाजी विद्या मंदिर आणि कन्या विद्या मंदिर या शाळांना भेट दिली. ढोल ताशांच्या गजरात आणि हलगीच्या कडकडाटात लेझीम नृत्य सादर करत, पारंपारिक वेशभूषेत आलेल्या मुलांचं शाळेच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. खा. धनंजय महाडिक यांनी गुलाब पुष्प देवून प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वागत केले.
खा. महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते, विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप करून, वृक्षारोपण झाले. अशा उपक्रमातून शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक होईल, असा विश्वास खा. महाडिक यांनी व्यक्त केला. तसेच नवी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते असे सांगून, देशाला महासत्ता बनवण्यामध्ये शिक्षण व्यवस्थेचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. दरम्यान वडणगेच्या सरपंच संगीता पाटील यांनी सरकारी शाळेत प्रवेश विद्यार्थ्यांच्या परिवाराला घरफाळा आणि पाणीपट्टी मध्ये सवलत देण्याचे जाहीर केले.
यावेळी उपसरपंच उमाजी शेलार, बाजीराव पाटील, तानाजी पाटील, एम. बी. किडगावकर, इंद्रजित पाटील, सर्जेराव पाटील, कृष्णात जौंदाळ, बाबासाहेब पाटील, चिखलीचे सरपंच रोहित पाटील यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.