दहशतवादी तळांवर कारवाई का केली? भारतीय लष्कराने स्पष्टच सांगितलं...

दहशतवादी तळांवर कारवाई का केली? भारतीय लष्कराने स्पष्टच सांगितलं...

नवी दिल्ली :  देशात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बुधवारी पाकिस्तानविरोधात ठोस पाऊल उचललं. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ही कारवाई दहशतवाद रोखण्यासाठी करण्यात आली असून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यापासून थांबवण्याचा हेतू यामागे होता. भारत सरकार आणि लष्कराने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत माहिती दिली.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि १ नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. हा हल्ला मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर सामान्य नागरिकांना लक्ष्य करणारा सर्वात मोठा हल्ला ठरला. हल्लेखोरांनी निर्दयतेने नागरिकांना कुटुंबासमोर गोळ्या घातल्या आणि जिवंत राहिलेल्यांना हा संदेश पोहोचवायला सांगितलं.

परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केलं की, हा हल्ला जम्मू-काश्मीरमधील शांतता आणि पर्यटनाच्या विकासाला बाधा आणण्यासाठी करण्यात आला. मागील वर्षी २ कोटीहून अधिक पर्यटक काश्मीरला गेले होते, ही आकडेवारी विकासाच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीचं उदाहरण होती. दहशतवाद्यांचा हेतू हा होता की, या प्रगतीला नुकसान पोहोचवून काश्मीरला मागे टाकावं आणि सीमापार दहशतवादाला चालना द्यावी.

टीआरएफ या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तपासात या संघटनेचे पाकिस्तानशी संबंध स्पष्ट झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांची ओळख पटवली असून दहशतवादी अड्ड्यांची ठोस माहिती मिळाल्यावर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील तळांवर लक्ष्यभेदी हल्ले केले.

परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केलं की, ही कारवाई युद्ध नव्हे, तर दहशतवादविरोधी लढ्याचा भाग आहे. भारताची ही निर्णायक कारवाई जागतिक स्तरावरही महत्त्वाची मानली जात आहे.