विद्यार्थ्यांच्या घडणीत बापूजींचे मोलाचे योगदान - पालकमंत्री प्रकाश आबीटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बापूजींच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या घडणीत बापूजींचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर म्हणाले, “डॉ. बापूजी साळुंखे यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. प्रत्येक शिक्षकाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणे हेच असले पाहिजे. चिंतन, मनन आणि मनाची घुसळण ही अध्यापन प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी करून दिली. त्यांनी सांगितले की, “बापूजींनी शिक्षकाला ‘गुरुदेव कार्यकर्ता’ संबोधले. त्यांनी समाजातील गोरगरीब, वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले. त्यांचे शिक्षण मूल्याधिष्ठित आणि विद्यार्थी-केंद्रित होते.”
यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी शिक्षण व राजकारणात मातीशी नाळ जोडून साधेपणाने समाजसेवा केल्याचे गौरवपूर्वक नमूद केले. तसेच, लवकरच एआय आणि रोबोटिक्स शिक्षणाच्या प्रसारासाठी विशेष अभियान राबवले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमात डॉ. एकनाथ आळवेकर, डॉ. डी.आर. तुपे, प्रा. हवालदार व प्रा. दिव्या बाबर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या वतीने प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सिरपचे अधिकारी रोहित शिंदे व अतिरिक्त आयुक्त संजय गुरव यांचीही विशेष उपस्थिती लाभली.