धक्कादायक प्रकार..! पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा

धक्कादायक प्रकार..! पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा

जळगाव प्रतिनिधी  : चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे १७ जून रोजी संध्याकाळी आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे ८० पेक्षा अधिक लोकांना विषबाधा झाली आहे. यात ३० पेक्षा अधिक जणांवर अडावद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत, तर उर्वरितांनी खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतले आहेत.कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ बाजारासाठी आले होते. तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्लेल्या व्यक्तींना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, आणि पोटदुखी असे त्रास जाणवू लागले. संध्याकाळी ६ वाजेनंतर रुग्णांची संख्या वाढू लागली. अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रासह अडावद व चोपडा येथील खासगी रुग्णालयांतही अन्न विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली.

यापैकी गंभीर रुग्णांमध्ये डिंपल कोळी (१६), आयर्न सपकाळे (७), पवन सोनवणे (१३), निकिता कोळी (१३), चेतना सपकाळे (१९) यांच्यासह ३० जणांना उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला जबाब दिला आहे.

या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे आणि प्रशासनाने पाणीपुरी विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.