अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम सन 2025 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडिद, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होवून राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
पीक स्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी -
पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख- मूग व उडिद - 31 जुलै
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफुल - 31 ऑगस्ट
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पीकासाठी स्वतंत्र असणार आहे. सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये 300 व आदिवासी गटासाठी रक्कम रुपये 150 राहील.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पीकाच्या बाबतीत किमान 20 आर (20 गुंठे) व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
पीक स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे -
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8 अ उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत इत्यादी.
सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे.
तालुका पातळी- पहिले- 5 हजार, दुसरे- 3 हजार व तिसरे 2 हजार
जिल्हा पातळी- पहिले- 10 हजार, दुसरे- 7 हजार व तिसरे 5 हजार
राज्य पातळी - पहिले- 50 हजार, दुसरे- 40 हजार व तिसरे 30 हजार
अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावर सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. खरीप हंगाम 2024 मध्ये पीक स्पर्धेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याप्रमाणे खरीप हंगाम सन 2025 पीक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परीट आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.