उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा? एकच 'मिशन' महापालिका 'इलेक्शन'

उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा? एकच 'मिशन' महापालिका 'इलेक्शन'

मुंबई : महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयशाचा सामना करावा लागला. महायुतीला मात्र या निवडणुकीत चांगले यश मिळाले. असे असताना आता उद्धव ठाकरे आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने तयारीही केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात  उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील सर्व आजी-माजी नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक घेतली. 

ईव्हीएम प्रश्नात आम्ही लक्ष घालू, तुम्ही संघटनात्मक बांधणी करा 

यावेळी आजी-माजी नगरसेवकांसोबत चर्चा करताना ठाकरे म्हणाले. आम्हाला सोडून गेलेल्या गद्दारांची पर्वा नाही.आता आपल्याला संपूर्ण ताकदीनिशी नवीन उड्डाण भरायची आहे. ईव्हीएमचा प्रश्न आहे, आम्ही त्यात लक्ष घालू. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी तुम्ही कामाला लागा. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. बेफिकीर राहू नका, लोकांमध्ये जा आणि नव्या ऊर्जेने काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.

एकच 'मिशन' महापालिका 'इलेक्शन'

ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागात तयारीला सुरुवात केली असून, बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुंबईतील आमदारांसह नेते, सचिव आणि संघटकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, सुनील शिंदे, अमोल कीर्तिकर यांच्यासह एकूण 18 जणांची टीम प्रत्येकी दोन विधानसभेतील बारा प्रभागांचा आढावा घेणार आहे. पुढील आठवडाभरात हा अहवाल तयार करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवला जाणार आहे.यावरून उद्धव ठाकरे यांचे आता एकच 'मिशन' महापालिका 'इलेक्शन' उद्दिष्ट असल्याचे पाहायला मिळत आहे.