संजय राऊतांची निलम गोऱ्हे यांच्यावर टीका, म्हणाले 'ती' बाई...

मुंबई : शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. या वक्तव्याने महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. ठाकरे गटात पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत असल्याचं नीलन गोऱ्हे म्हणाल्या होत्या. यावर ठाकरे गटाचे आक्रमक नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नीलम गोऱ्हे या निर्लज्ज आणि नमकहराम बाई असल्याचं राऊत म्हणाले.
नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि नमकहराम बाई आहे. हा शब्द कापू नका, दोन्ही शब्द असंसदीय नाहीयेत. साहित्य संमेलनामध्ये मराठी संस्कती, साहित्य, मराठी भाषा आणि विस्तार यावर चर्चा झाला पाहिजे. देशाच्या राजधानीत महाराष्ट्रातील नेत्यांवर राजकीय चिखलफे करण्यासाठी भरवलं का? साहित्य महामंडळाकडे खंडणी घेऊन संमेलन भरवताय, सरकारने दोन कोटी रूपये दिले की त्यातले २५ लाख काढून घ्यायचे आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायची. कार्यक्रम हे महामंडळ ठरवतात आणि आयोजक हे सतरंज्या उचलायला असतात. उषा तांबे यांनी कार्यक्रमपत्रिका भरवली, ज्यांचे पतीराज हे PWD सेक्रेटरी होते जे सर्वात भ्रष्ट खातं.
नीलम गोऱ्हे यांचे कालचे वक्तव्य ही त्यांची विकृती आहे. मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले ही कोण बाई आणली? सुरुवातीला बाळासाहेबांनी प्रश्न केला ही कुठलं ध्यान पक्षात आणलंय जे आयुष्यभर शिव्या घालणार, पण काही लोकांच्या मर्जीखातर आल्या चार वेळा आमदार झाल्या. जाताना ताटामध्ये घाण करून गेल्याचं संजय राऊत म्हणाले.