कोल्हापूरच्या १२ धावपटूंनी पार केली ९० किमीची जगातील सर्वांत जूनी व अत्यंत खडतर ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूरच्या धावपटूंनी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ ही ९० किलोमीटरची शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली. यंदाची शर्यत पिटरमारिट्सबर्ग ते डर्बन या मार्गावर पार पडली. यशस्वी सर्व धावपटूंचे आज सकाळी सात वाजता कोल्हापुरात आगमन झाले. विविध संस्था संघटनांच्या वतीने त्यांचे छत्रपती ताराराणी चौकात स्वागत करण्यात आले.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते सर्व धावपटूंचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला सार्थ अभिमान वाटावा अशी कामगिरी या धावपटूंनी केली असल्याचे कौतुक उद्गार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी यावेळी काढले. यानंतर धावपटूंच्या सहभागाने मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यासह पोलीस ग्राउंड येथे धावपटूंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कोल्हापूरच्या चमूमध्ये १२ धावपटू सहभागी झाले होते, त्यापैकी २ महिला धावपटूंनी देखील ही अतिशय आव्हानात्मक शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली. या सर्वांनी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सराव, पोषण नियोजन आणि मानसिक तयारी यांचा समन्वय साधत ही महान धाव पूर्ण करण्यात यश मिळवले.
कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन केवळ लांब अंतराची शर्यत नसून, ती शरीर, मन आणि इच्छाशक्तीची कसोटी असते. यंदाच्या मार्गामध्ये जवळपास १२०० मीटर elevation होते, आणि Cowies Hill, Fields Hill, Botha’s Hill, Inchanga, Little Polly, Polly Shortts असे सात मोठे डोंगर व बऱ्याच छोट्या टेकड्या पार कराव्या लागल्या. या चढावांमुळे शर्यत अधिकच आव्हानात्मक ठरली.
शर्यतीचा आणखी एक कठीण पैलू म्हणजे हवामानातील तीव्र बदल. पिएटरमारिट्सबर्गमध्ये सकाळच्या थंड हवामानात सुरुवात होत असली तरी, डरबनच्या दिशेने जाताना तापमान झपाट्याने वाढून २५ अंश सेल्सिअसच्या वर गेले. अशा वेळी शरीर थकत जातं, पाय जड होतात, पण मनाच्या ताकदिमुळेच प्रत्येकाने अंतिम रेषा गाठली.
शर्यत १९२१ साली सुरु झाली असून यंदाचे हे ९८ वे वर्ष होते. जगभरातील विविध देशातून २५,००० हून अधिक धावपटूंनी यंदा यात सहभाग घेतला. यामध्ये भारतातून ४०० पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला, यापैकी ५० महिला धावपटू होत्या. ही भारतासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली.
कोल्हापूरच्या चमूने केवळ वैयक्तिक यश मिळवले नाही, तर एकमेकांना प्रेरणा देत, उत्साह वाढवत, आणि खऱ्या अर्थाने टीमवर्कचे दर्शन घडवत ही शर्यत यशस्वी केली. त्यांची कामगिरी कोल्हापूरमधील नवोदित आणि हौशी धावपटूंना जागतिक स्तरावर धावण्याची प्रेरणा देणारी ठरली आहे. रविवारी झालेल्या स्पर्धेच्या निकालातून प्रेरणा घेऊन २०२७ मध्ये होणाऱ्या या शर्यतीच्या शतकोत्तर पर्वात, कोल्हापूरकडून जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी व्हावेत अशी अपेक्षा या चमूने व्यक्त केली.
या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धक व त्यांनी नोंदवलेली वेळ खालील प्रमाणे -
अमोल यादव - 7:51
चेतन चव्हाण - 10:28
डॉ. विजय कुलकर्णी - 10:52
दिलीप जाधव - 10:55
गोरख माळी - 11:45
सचिन बुरसे - 8:15
स्वरूप पुजारी - 11:44
विजय पाटील - 11:57
आम्रपाल कोहली - 11:34
सुषमा रेपे - 11:25
डॉ. केतकी साखरपे - 10:56
डॉ. पराग वाटवे - 11:40
यावेळी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, कार्यकारी अभियंता बी. एल. हजारे, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, क्रीडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे, ऍड. राजेंद्र किंकर यांच्यासह कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब, तगडा ग्रुप, कोल्हापूर फोरम, मॅक सदस्य तसेच विविध क्षेत्रावरतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.