गुंठेवारी नियमित करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरुच ठेवा-आ.सतेज पाटील

गुंठेवारी नियमित करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरुच ठेवा-आ.सतेज पाटील

कोल्हापुर (प्रतिनिधी) : राज्यातील गुंठेवारी प्रकरणे नियमित करण्यासाठी महापालिकांनी ठराविक मुदत न ठेवता ही प्रक्रिया सुरुच ठेवावी अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी अधिवेशनात केली. यावर नगरविकास विभागाच्यावतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत सरकार सकारात्मक असून प्रत्येक महानगरपालिकेशी बोलून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

राज्यात २०२० पर्यंतची गुंठेवारी प्रकरणे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी महापालिका ठराविक मुदत ठरवते. मुदतीत ज्यांचे अर्ज आले आहेत त्यांचीच प्रकरणे नियमित करणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, अनेकांनी यासाठी अर्ज केलेले नाहीत. सरकार २०२० पर्यंतचीच गुंठेवारी प्रकरणे नियमित करणार आहे. त्यामुळे ही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरुच ठेवावी. अर्ज करण्यास महापालिकांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली. यावर नगरविकास मंत्र्यांच्या वतीने उद्योगमंत्री सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, नागपूर महापालिकेच्याबाबतील आपण हा मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. त्याच पध्दतीने प्रत्येक महानगरपालिकेशी बोलून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मंत्री उदय सामंत यांनी सांगीतले.