छत्रपती संभाजीराजे यांनी केली मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी, म्हणाले...

छत्रपती संभाजीराजे यांनी केली  मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी, म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता वातावरण ढवळून निघाले आहे. वाल्मिक कराडांना अद्याप अटक होत नसल्याने वातावरण तापले आहे. बीडमध्ये आता मोर्चाला सुरुवात होत आहे. 

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी बीडच्या गुन्हेगारी पॅटर्नबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात.त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली, महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती झाली आहे, मला बोलायला लाज वाटते महाराष्ट्राचे बीड झालं आहे, १९ दिवस झाले अजून अटक नाही, वाल्मिक कराड बेपत्ता आहे’, असा घणाघात छत्रपती संभाजीराजे यांनी केला. 

महाराष्ट्रात काय चालले आहे, असा प्रश्न त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कौशल्य दाखवा, खऱ्या आरोपीला अटक करून दाखवा. कराड याला संरक्षण देणारे तिथले मंत्री यांची हकालपट्टी का झाली नाही? त्यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आमचा सवाल आहे, असे ते म्हणाले. या मोर्चाला जातीय वळण नाही, हा सर्वधर्मीय मोर्चा आहे, असे त्यांनी वक्तव्य केले.

'हे' तर न पटणारे

अशी प्रकरणे राज्याला परवडणारी आहेत का, असा सवालही राजेंनी यावेळी केला. स्वत: पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत वाल्मिक शिवाय धनंजय मुंडे यांचे पान हलत नाही. बीडमध्ये जे चाललं आहे ते तुम्हाला पटते का. बीडची गुन्हेगारी पाहून मी चकित झालो, स्वत: मुंडे यांचा हातात बंदुक घेऊन फोटो आहे, हे काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का? त्यांना मंत्रिपद देऊ नका असे माझे म्हणणे होते. धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड कुठं आहे हे माहिती नसणे हे पटणारे नाही. मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.