ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ पद्मश्री पुरस्कार स्विकारल्यानंतर काय म्हणाले ...

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ पद्मश्री पुरस्कार स्विकारल्यानंतर काय म्हणाले ...

मुंबई -  मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदाच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या भव्य समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

मला विसरले नाहीत, हेच महत्त्वाचं -

पुरस्कार स्विकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना अशोक सराफ म्हणाले, "हा एक मोठा सन्मान असून, आनंददायक क्षण आहे. माझ्या कामाचा विचार झाला, मला पात्र समजलं गेलं, याबद्दल मी सरकारचा आभारी आहे. मी नक्कीच काहीतरी चांगलं केलं असावं." असंही ते म्हणाले. 

पुरस्कार उशिरा मिळाला असं विचारल्यावर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले, "उशीर झाला असं वाटत नाही. मला विसरले नाहीत, हेच महत्त्वाचं. विसरले असते, तर मी तसं बोललो असतो."  "आता जबाबदारी अधिक वाढली" पुरस्कारानंतरची जबाबदारी त्यांनी स्पष्टपणे मान्य केली. "पद्मश्री मिळाल्यानंतर थांबून चालणार नाही. पुढचाही विचार करावा लागेल. या पुरस्काराची प्रतिष्ठा राखली पाहिजे," असेही अशोक सराफ म्हणाले. 

इंस्टाग्रामवर अभिनेते अशोक सराफ यांनी भावना केल्या व्यक्त  - 

https://www.instagram.com/reel/DKKTNdws2P2/?utm_source=ig_web_copy_link 

अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पद्मश्री स्वीकारतानाचा व्हिडिओ शेअर करत भावनिक संदेश दिला. त्यांनी लिहिले, "पद्मश्री हा माझ्या आयुष्यातील एक विशेष क्षण आहे. महाराष्ट्र शासन, माझे कुटुंब, सहकलाकार आणि प्रेक्षकांचे आभार — तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं." अशा मजकूराच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अभिनय क्षेत्रात 50 वर्षांचा ठसा

अशोक सराफ यांचा जन्म 1947 साली मुंबईत झाला. त्यांनी ‘जानकी’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. दादा कोंडके यांच्यासह 'पांडू हवालदार'मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. 'आयत्या घरात घरोबा', 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका', 'गंमत जंमत' अशा असंख्य सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. मराठीबरोबरच बॉलिवूडमध्येही 'करण अर्जुन', 'येस बॉस', 'सिंघम', 'गुप्त', 'कोयला' यांसारख्या हिट चित्रपटांमधून त्यांनी वेगळी छाप पाडली. त्यांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांचा समावेश आहे.