टीम इंडियाने पाकिस्तानचा केला पराभव ; मास्टर ब्लास्टरने 'या' खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय

मुंबई : चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या सामन्यामध्ये पाकिस्तानने पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी २४१ वर पाकिस्तानला ऑल आऊट केलं होतं. यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. त्याच्या तोंडीला खेळी करत श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाने ४५ चेंडू आणि ६ विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह पाकिस्तानला पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेमध्ये धूळ चारली. या विजयानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाचं अभिनंदन करताना एक खास पोस्ट केली आहे.
काय म्हणाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ?
बहुप्रतीक्षित सामन्याचा परिपूर्ण शेवट. खरा नॉकआउट! विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांची सुपर खेळी त्यासोबतच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली, खास करून कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या, असं सचिन तेंडुलकर याने पोस्ट करत म्हटलं आहे.
या सामन्यामध्ये किंग कोहली याने १११ चेंडूत १०० धावा केल्या. यामध्ये त्याने ७ चौकार मारले. श्रेयस अय्यरने ५६ धावा आणि शुभमन गिलने ४६ धावा केल्या. तर बॉलिंगमध्ये हार्दिक पंड्याने दोन तर कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या होत्या. स्टार खेळाडू मोहम्मद शमीला मात्र एकही विकेट घेता आली नाही. विराट कोहलीने यावेळी रेकॉर्ड बनवत आपल्या वनडे करियरमधील ५१ व्या शतकाला गवसणी घातली.याचबरोबर त्याने या सामन्यात १४ हजार धावांचा टप्पा ओलांडला.