... तरीही माझ्या कर्तव्यात कोणीही आडवं येऊ शकत नाही : उज्ज्वल निकम

... तरीही माझ्या कर्तव्यात कोणीही आडवं येऊ शकत नाही : उज्ज्वल निकम

पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. यानंतर  फडणवीस सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर निकम यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. मी राजकारणात असलो, तरी माझे कर्तव्य आणि ड्युटी यांच्या आड कोणीही आडवं येऊ शकत नाही, असं उज्ज्वल निकम यांनी निक्षून सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.

काय म्हणाले उज्ज्वल निकम ?

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून माझी नियुक्ती व्हावी, अशी मस्साजोगच्या ग्रामस्थांची मागणी होती. काल त्यांनी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली, हे ऐकून मी खूप व्यथित झालो. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवलं, की मी हा खटला चालवायला तयार आहे. त्यानुसार यासाठी त्यांनी आज आदेश पारित केले, असं उज्ज्वल निकम म्हणाले.

मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे. याचप्रमाणे मस्साजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेन, की आपण हे उपोषण सोडावं. कारण या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे. आपण असं कोणतंही कृत्य करु नये ज्याने तब्येतीला त्रास होईल. तपास यंत्रणा ज्यावेळी आरोपपत्र दाखल करतील, तेव्हा आम्ही खटला तातडीने चालवायला घेऊ, असं मी तुम्हाला आश्वासन देतो, असंही निकम पुढे म्हणाले.

मी आधी राजकारणात अॅक्टिव्ह नव्हतो, पण मी राजकारणात असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कोणीही आडवं येऊ शकत नाही. मी त्याच जोमाने काम करणार, कोणाच्या विरोधाला मी जुमानत नाही. विरोधासाठी विरोध हा त्यांचा स्थायी स्वभाव झालेला आहे. अजून आरोपपत्रही पाहिलं नाही, त्यानंतरच त्यावर सविस्तर बोलेन, असंही उज्ज्वल निकम म्हणाले.