महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, प्रशासन यांच्या संयुक्त समिती स्थापन कराव्यात : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरात लवकर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आणि प्रशासन यांच्या संयुक्त समिती स्थापन कराव्यात, जेणेकरून विद्यार्थिनींच्या समस्यांचे त्वरित निराकरण होईल, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कठोर पाऊले उचलली आहेत. त्यांनी शुक्रवारी (दि. १४) पुण्यातील गरवारे महाविद्यालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या फी माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी तपासण्यासाठी थेट महाविद्यालयांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयाला अचानक भेट दिली.
उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर आणि सहसंचालक प्रकाश बच्छाव हे देखील भेटी दरम्यान उपस्थित होते. विद्यार्थिनींना शासकीय योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी ३१ मार्चपर्यंत संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या, परंतु आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलींसाठी, शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, राज्यातील मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे, याचा आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेटी देणार असल्याचे सांगितले. ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भत्ता वाढवण्याची मागणी(education) करण्यात आली होती, या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.