माजी सरपंच छाया सारंग यांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार २०२५” जाहीर

गारगोटी (प्रतिनिधी) - गारगोटी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच छाया विजय सारंग यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे ग्रामपंचायत स्तरावरील “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार २०२५” जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.
हा पुरस्कार गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सदस्य व सेवक वर्ग यांच्या उपस्थितीत सारंग यांना प्रदान करण्यात आला.छाया सारंग गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असून, त्या महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. तसेच, ताराराणी फेडरेशनच्या माध्यमातून विजयमाला प्रकाश आबिटकर यांच्यासोबत त्यांनी सेवा कार्य उभं केलं आहे.
तसेच, मा. जि. प. सदस्या रोहिणी अर्जुन आबिटकर यांच्या सहकार्यानेही त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. जिजाऊ महासंघाच्या माध्यमातून २५ बचत गटांचे व्यवस्थापन त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले आहे. सारंग यांनी २०१३ ते २०१६ या काळात गारगोटी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते “उत्कृष्ट सरपंच पुरस्कार” देखील मिळाला होता.
त्यांचे कार्य सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर व प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच प्रभावी राहिले आहे. सामाजिक कार्याची धुरा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळत त्यांनी आणली आहे.