लग्नानंतर मनासारख्या भूमिका .. ; जिनिलिया देशमुखने केलेलं वक्तव्य चर्चेत

लग्नानंतर मनासारख्या भूमिका .. ; जिनिलिया देशमुखने केलेलं वक्तव्य चर्चेत

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती आमिर खानच्या आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ मुळे. या सिनेमात ती आमिर खानच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणार असून, अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर तिचा हा मोठा कमबॅक मानला जात आहे. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी जिनिलियाने ऑडिशन दिली होती आणि नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं यावर खुलं मनाने भाष्य केलं आहे. जिनिलियाने २०१२ मध्ये अभिनेता रितेश देशमुखसोबत विवाह केला आणि त्यांना रियान आणि राहिल ही दोन मुलं आहेत. मातृत्वानंतर जिनिलियाने सिनेसृष्टीपासून काही काळ विश्रांती घेतली होती. याबाबत जिनिलिया म्हणाली, “लग्न आणि मुलं झाल्यानंतर मी ब्रेक घेतला. नंतर मला मनासारख्या भूमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे मी थांबले. आता पुन्हा काम सुरू केलं आहे.”

‘सितारे जमीन पर’ विषयी ती म्हणाली, “जेव्हा लोकांना समजलं की, मी आमिर खानच्या चित्रपटात काम करतेय, तेव्हा प्रत्येकाची प्रतिक्रिया होती की, ‘अरे वाह ! किती नशिबवान आहेस’. पण मी सांगायचे, ही संधी मिळणं हे आमिर सरांचं मोठेपण आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी आजही ऑडिशन देते, आणि पुढेही चांगल्या भूमिकांसाठी काम करेन.”

मुख्य भूमिका आणि इंडस्ट्रीतील धारणा यावर भाष्य करत जिनिलिया म्हणाली, “इथे एक विशिष्ट चौकट आखलेली आहे. विवाहित अभिनेत्रीला मुख्य भूमिका नको असं समजलं जातं, पण हे चुकीचं आहे. भूमिका योग्य असावी, पात्राशी वय जुळत असावं ही गोष्ट महत्त्वाची आहे.”

जिनिलिया पुढे म्हणाली, ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात मी चाळिशीच्या एका महिलेची भूमिका साकारतेय. अशा वयाच्या भूमिका जेव्हा खूपच तरुण कलाकारांना दिल्या जातात, तेव्हा त्या पात्राच्या अनुभवांची खोली कळत नाही. त्यामुळे योग्य वयाच्या कलाकारांनाच योग्य भूमिका द्यायला हव्यात.”

जिनिलियाचा हा स्पष्ट वक्तेपणा आणि अभिनयात पुनरागमन करण्याची तिची जिद्द प्रेक्षकांच्या मनात नव्या अपेक्षा निर्माण करत आहे. ‘सितारे जमीन पर’ तिच्या करिअरला नवा आयाम देईल, अशी आशा तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.