सर्वसामान्य मतदारांच्या सहकार्याने निवडणूकीतील चक्रव्यूह भेदला- मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

मडिलगे प्रतिनिधी : या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधातील चक्रव्यूह सामान्य मतदारांच्या सहकार्याने भेदला, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले . मडिलगे ता. आजरा येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते .
स्वागत सुशांत गुरव यांनी केले. प्रास्ताविकात सरपंच बापू निऊंगरे यांनी गावात झालेल्या विकासकामांची कामांची माहिती दिली. गावात शाळा , सभागृह , पाणंद रस्ते डांबरीकरण, वाढीव गावठाणचा सी . टी . सर्व्हे करण्यासाठी प्रयत्न व्हावा. आमचं गाव कायमस्वरूपी दत्तक घ्यावे, असे आवाहन सरपंच निऊंगरे यांनी केले.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले , विधानसभा निवडणूकीत विरोधकांनी केलेल्या विषारी अपप्रचाराला जनता बळी पडली नाही . म्हणूनच मी आज तुमच्यासमोर मंत्री म्हणून उभा आहे. विविध खात्याचे मंत्री म्हणून राज्यात केलेल्या कामाचा आढावा घेतला. आरोग्यसेवा , बांधकाम कामगार योजना या योजनांमधून दिल्या जाणाऱ्या लाभांची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
बांधकाम कामगार केंद्रांची संख्या वाढवून लोकांची गैरसोय दूर करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आरोग्याची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खाते जाणीवपूर्वक मागून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात कोल्हापूर येथील शेंडापार्कात ११०० बेडचे हॉस्पिटल उभारले जात आहे . उत्तूर येथे देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय मंजूर केले आहे. गोकुळचे म्हैस दूध वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कोणतीही योजना बंद होणार नाही कोणीही काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर मंत्री मुश्रीफ यांचा मडिलगे ग्रामस्थ, हनुमान संस्था समूह, भावेश्वरी संस्था समूह, आजी -माजी सैनिक संघटना, गणेशोत्सव मंडळ, ग्रामपंचायत यांच्यावतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी युवराज येसणे, माजी सभापती दिपक देसाई, तालुका शेतकरी संघाचे नूतन चेअरमन महादेव पाटील (धामणेकर ) यांनी मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमाला आजरा कारखाना चेअरमन वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई , विष्णूपंत केसरकर, मारुती घोरपडे, काशिनाथ तेली, के . व्ही . येसणे, भिकाजी गुरव , शिरिष देसाई , पांडूरंग जाधव , सुनील देसाई , ज्ञानदेव पोवार , युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर , गणपतराव पाटील , सुनील देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .
शिवाजी पारळे यांनी सूत्रसंचलन केले. ग्रामपंचायत सदस्या मनिषा काणेकर यांनी आभार मानले .
*जिल्हयातील एकाही महिलेचा कॅन्सरने मृत्यू होणार नाही.......*
मंत्री मुश्रीफ म्हणाले, महिलांना होणारा कॅन्सर आणि त्यामुळे होणारे मृत्यू, ही गंभीर बाब आहे. आगामी काळात जिल्ह्यातील एकाही महिलेचा कॅन्सरने मृत्यू होऊ नये यासाठी नवी मोहिम हाती घेऊन लसीकरण करणार आहे.