गांधीनगर परिसरातील "बाल्या गँग" 2 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून केली हद्दपार

गांधीनगर परिसरातील "बाल्या गँग" 2 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून केली हद्दपार

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हयातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणा-या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटणासाठी गुन्हेगारावर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर एमपीडीए तसेच हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत.

कोल्हापूर जिल्हयातील गांधीनगर व कोल्हापूर शहर परिसरामध्ये सार्वत्रिक हितास बाधक अशा स्वरुपाचे गुन्हयांना परिणाम देणा-या "बाल्या गैंग " या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख प्रशांत उर्फ बाल्या अर्जुन मिसाळ, रा. गांधीनगर, वेदांग शिवराज पोवार, रा. बिंदु चौक कोल्हापूर, महश दुर्गा माने, रा. मोहिते कॉलनी कदमवाडी, अक्षय दिपकलाल चावला, रा. शिरु चौक गांधीनगर यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ पुनःप्रस्थापित करण्यासाठी, गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने टोळी हद्दपारीचा प्रस्ताव हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केला होता.

कोल्हापूर जिल्हयाचे हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी सदरच्या प्रस्तावांची निः पक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी विभाग, यांची नियुक्ती केली होती. त्यांनी चौकशीअंती अहवाल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केला होता. चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर वेळावेळी हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्या समक्ष घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी बाल्या गँगला आपली बाजू मांडण्यासाठी अवधी दिला होता. घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये, बाल्या गँगच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच सामाजिक स्वस्थ्यास बाधा निर्माण होत असल्याने या टोळीच्या परिसरातील वास्तव्यामुळे भय व धोका निर्माण झाला असून बाल्या गँगचा सातत्याने बेकायदेशीर रितीने वागण्याचा हेतू असल्याचं स्पष्ट झालं. 

या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरीकांचे जिवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रीक हित लक्षात घेऊन हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी "बाल्या गैंग" या टोळीच्या प्रमुखासह ३ जणांना कोल्हापूर जिल्हयाच्या हद्दीतून दोन वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपारीचे आदेश पारित केले. पारित केलेल्या आदेशाची गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तीन जाबदारांवर अंमलबजावणी केली आहे.

हद्दपार कारवाई केलेली बाल्या गँग कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणाला दिसून आली तर गांधीनगर पोलीस ठाण्यात अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे कोल्हापूर पोलीस दलाने नागरीकांना आवाहन केले आहे.