'तो' बिजनेससाठी बँकॉकला गेला, घरी कोणालाच सांगितले नाही... मोठ्या चिरंजीवाने सांगितले कारण
!['तो' बिजनेससाठी बँकॉकला गेला, घरी कोणालाच सांगितले नाही... मोठ्या चिरंजीवाने सांगितले कारण](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67ab1441b2965.jpg)
पुणे : माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या लहान मुलाचे तथाकथित 'अपहरणनाट्य' सोमवारी सायंकाळी रंगले. मुलाला दोघे जण कारमधून घेऊन गेल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिस तपासात तो मुलगा लोहगाव विमानतळावरून 'चार्टर्ड' विमानातून मित्रांसह बँकॉकला निघाल्याचे समोर आले. त्यानंतर कायदेशीर पाठपुरावा करून ते विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरविण्यात आले. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज याचे अपहरण झाल्याची बातमी सायंकाळी साडेचारनंतर समोर आली. तो मुलगा खासगी विमानाने रवाना झाला आहे, असे थोड्या वेळाने समोर आले. सावंत यांनी मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा संपर्क न झाल्याने सावंतांनी पोलिस आयुक्तालयात धाव घेतली होती. आता घडलेल्या प्रकाराबाबत तानाजी सावंत यांचे मोठे चिरंजीव गिरीराज सावंत यांनी खुलासा केला आहे.
काय म्हणाले गिरीराज सावंत ?
काल साधारण तीन-साडेतीन वाजताच्या सुमारास आम्हाला एक धक्कादायक मेसेज आला. माझ्या छोट्या भावाचा मेसेज होता, की मी दोन दिवसांसाठी बाहेर जातोय, पण आधी असं कधीच झालं नव्हतं. बाहेरगावी असो किंवा परदेशी, आम्ही एकमेकांना सांगूनच जातो. आठ ते दहा दिवसांपूर्वीच तो दुबईला गेला होता. तिथून तो सहा-सात दिवसांनी आला आणि अचानक फोन स्वीच ऑफ करुन निघून गेला, असं गिरीराज यांनी सांगितलं.
ऋषिराज निघून गेल्यानंतर साधारण साडेतीन वाजताच्या सुमारास थोडी पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली. आमचे घरचे, आई-वडील हायपर झाले. कुठेच संपर्क होत नसल्यामुळे आम्ही पहिला पोलीस स्टेशनला एफआयआर नोंद केला. मग माहिती घेण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अण्णा यांच्या माध्यमातून समजलं की तो प्रायव्हेट चार्टर्ड विमानाने बँकॉकच्या दिशेने रवाना झाला, असं गिरीराज यांनी सांगितलं.
वैयक्तिक बिझनेसचं काम होतं. आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेल्यामुळे परत गेलो, तर घरचे नाही म्हणतील, या भीतीने तो न सांगता गेला. पोलीस प्रशासनामुळे ट्रेस करता आलं. आम्ही पोलीस, राज्य आणि केंद्र सरकार आणि शासनाचे आभारी आहोत, असंही गिरीराज म्हणाले.