कोल्हापूरच्या विविध समस्यांवर अधिवेशनात आवाज उठवणार:आम.जयश्री जाधव

कोल्हापूरच्या विविध समस्यांवर अधिवेशनात आवाज उठवणार:आम.जयश्री जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराची हद्द वाढ, शाहू मिलच्या जागेत शाहू स्मारक, शहरातील उद्याने, रंकाळा तलाव व क्रीडांगणाचा विकास, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र, सीपीआर रुग्णालय, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती, रिक्षा व्यवसायिकांच्या समस्या, महापालिका गाळेधारकांच्या समस्या, आयटी पार्क, उद्योजकांच्या समस्या यासह  कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या विविध प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनात २१४ तारांकित व १९ लक्षवेधी उपस्थित केल्याची माहिती आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी दिली.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विधानसभेत लक्षवेधी द्वारे सभागृहाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी महापालिका निवडणुकीनंतर हद्दवाढ करण्यात येईल अशी घोषणा केली होती. परंतु निवडणुकीचे कारण देऊन हद्दवाढ पुढे ढकलू नका अशी विनंती मी शासनाला केली होती. यानंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ संदर्भात सर्वपक्षीय व्यापक स्वरूपात बैठक घ्यावी अशी, सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यानंतर ही बैठक झाली नाही. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्मरणपत्र दिले. मात्र आजपर्यंत बैठक झाली नाही किंवा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या अनुषंगाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हद्दवाढीसाठी अधिवेशनात पुन्हा आवाज उठवणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. 

शाहू मिलच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू स्मारक व्हावे यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. महापालिकेने याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवला आहे. या स्मारकासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकर निधी मिळावा अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे. कोल्हापूर शहरातील प्राथमिक सुविधांसाठी नगरोत्थान योजनेतून विविध प्रस्ताव सादर केले आहेत. ते शासन स्तरावरती प्रलंबित असून त्यासाठी निधी मिळावा. महापुराच्या काळात शहराचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी दुधाळी, नागाळा पार्क व बापट कॅम्प या तीन सब स्टेशनची उंची वाढावी असा प्रस्ताव शासन स्तरावरती प्रलंबित आहे यासाठी त्वरित निधी मिळावा. कोल्हापूरचे नैसर्गिक सौंदर्यात भर टाकणारा रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे, त्या प्रस्तावस मंजुरी मिळून त्वरित निधी मिळावा. तसेच कोटीतीर्थ तलावाच्या संवर्धन करावे. गांधी मैदान, बावडा पॅव्हेलियन, दुधाळी पॅवेलियन व ऐतिहासिक खासबाग मैदानाचा सर्वांगीण विकास व्हावा, कोल्हापूर शहरातील उद्यानांची दुरावस्था झाली असून उद्यानाच्या सर्वांगीण विकास व्हावा, शहरातील अंतर्गत रस्ते विकासासाठी भरीव निधी मिळावा,  महालक्ष्मी तीर्थ आराखडा, केशवराव भोसले नाट्यगृहाची दुरुस्ती, शहराच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, शहरात महिलांकरता स्वतंत्र स्वच्छता गृहाची उभारणी, अत्याधुनिक जलतरण तलाव, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) व सावित्रीबाई फुले रुग्णालय यांचे प्रलंबित प्रस्ताव, आयटी पार्क, परिख पुलाचे विस्तारीकरण, एसटी स्टँड ते राजारामपुरी या मार्गावरील रेल्वे फटका वरील पादचारी उड्डाणपूल, वीज दरवाढ, महिला सक्षमीकरण, महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्था, कोल्हापूर शहरामध्ये पोलीस आयुक्तालयाची स्थापना, पंचगंगा स्मशानभूमीतील दुरावस्था, आदी समस्यांकडे अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले असल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरातर्गत ड्रेनेज लाईन बदलण्याचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यासाठी निधी मिळून शहरातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा. तसेच शहरातील गटारे, चॅनेल, नाले समस्यांबाबत अधिवेशनात लक्षवेधी केल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत शहरातील वाहतूककोंडीची समस्या भीषण बनत चालली आहे. या कोंडीचा नागरिकांना रोजच त्रास होत आहे. वाहतूक कोंडी असलेल्या ठिकाणी अनेक अपघातांत हकनाक बळी गेले आहेत. जिथे जास्तीत जास्त कोंडी होते, अशा अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी कमी करण्यासाठी फ्लायओव्हर उभारण्यात यावेत, या प्रश्नाकडे अधिवेशनात लक्ष वेधल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.

कोल्हापुरातील आयटी पार्क विकसित व्हावा, त्याचबरोबर  कोल्हापूर फौंड्री हब म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी एखादा मोठा उद्योग यावा, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक व्हावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी केली आहे.

ऐतिहासिक शिवाजी पूल पुलाचे संवर्धन करून, पर्यटन क्षेत्र म्हणून विकासीत व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक शिवाजी पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी केली आहे. 

कोल्हापूर जनतेचे व राज्यातील हिताचे शेतकरी, विद्यार्थी, महिला, व्यापारी, कष्टकरी, अपंग, निराधार, कामगार व गोरगरीब सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व त्यांच्या मूलभूत हक्कांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्या बाबत सरकारला निर्णय घेण्याकरिता भाग पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून, कोल्हापूरच्या जनतेचा आवाज विधिमंडळात पोहोचण्यासाठी कटिबध्द असल्याचे आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी सांगितले.