सुरेश धस यांच्याबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले....

सुरेश धस यांच्याबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले....

मुंबई : मला बीडमधील एका प्रमुख नेत्याने आधीच सांगितलं होतं सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेवू नका. देशमुख कुटुंबासाठी लढा देतील आणि न्याय देतील, मला तेव्हा लोकांनी समजावलं तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका. धस हे कधीही पलटी मारतील. सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्देवाने हे सत्य होताना दिसतंय, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरणात आक्रमकपणे आमदार सुरेश धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडविरोधात पुरावे आणि नवनवीन आरोप केल्याने धस चर्चेत आले होते. मात्र आता सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने सर्वांच्या मनामध्ये वेगळीच संशयाची पाल चुकचुकत आहे. दोघांमध्ये काही समेट झालं आहे का? असे अनेक सवाल लोकांना पडू लागले आहेत. अशातच या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी धस यांच्याबाबत हे  विधान केले आहे.

'त्यांनी' देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार मांडला 

मला वाईट वाटतंय एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला. लहान मुलं त्यांच्या मागे धावत होती कारण हा माणूस आपल्याला न्याय देईल. जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर देव, इतिहास त्यांना क्षमा करणार नाही. असा खोटारडेपणा करत त्यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर त्यांना फक्त बीडचीच नाहीतर राज्याची जनता हे लक्षात ठेवेल. तुम्ही जे कृत्य केलेलं आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही. जर धसांनी असं काही केलं असेल तर विश्वासघातापेक्षा पुढचं पाऊल आहे. मला बीडची काही लोकं वारंवार सांगत होती की, धस मुंडे आणि कराड हे एकच आहेत. एका नाण्याला दोन बाजू असतात पण या तीन बाजू आहेत. पणी मी कोणावर विश्वास ठेवला नाही, पण मला अपेक्षा आहे की धस असं कोणतंही कृत्य करणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी धसांवर निशाणा साधला.